नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटात पती-पत्नीमध्ये काही कौटुंबिक कारणांवरून वाद झाल्याचा घटना या समोर येत असतात. पण त्यातील काही भांडणं ही काही वेळेस विकोपाला ही जातात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे.
जेवणात कोशिंबीर दिली नाही म्हणून पतीने पत्नीचा जीव घेतल्याची भयंकर घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील जलालपूर गावात ही संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर आरोपी पती फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोशिंबीरीसाठी पतीने केलेल्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. मुरली सिंह असं आरोपी पतीचं नाव आहे. मुरली सिंह नेहमीप्रमाणे आपल्या घरी जेवत होता. त्यावेळी त्याच्या पत्नीने ताटात कोशिंबीर वाढली नाही. त्यामुळे त्याचा पारा चढला आणि संतापाच्या भरात त्याने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. हातातील कुदळीने पत्नीवर प्रहार केला. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर आईला वाचवण्यासाठी पुढे आलेला 20 वर्षीय मुलगा अजय गंभीर जखमी झाला आहे.






