ठाणे (विशेष प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) – स्वर्गीय डॉ. नारायण तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि नीलपुष्प साहित्य मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ऑनलाइन १ जून २०२१रोजी काव्यसंध्या संपन्न झाली.
राजेंद्र सावंत यांनी गणेश वंदना गाऊन आजच्या काव्यसंध्येची सुरुवात केली. त्यानंतर श्री. राजेश साबळे यांनी तांबे सरांच्या आठवणी जागवत वर्धापनदिनानिमित्ताने प्रस्तावना सादर केली. त्यात त्यांनी तांबे सरांच्या आठवणींवर प्रकाश टाकला. त्यानंतर सदस्यांनी तांबे सरांशी निगडित आपल्या आठवणी सांगितल्या. त्यांच्या जीवनावर, त्यांच्या आठवणींवर तसेच नीलपुष्पवर आधारित अतिशय सुंदर रचना सादर केल्या. प्रत्येकाचीच रचना ही सर्वांना भावविवश करणारी होती.
आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात वसलेल्या तांबे सरांबद्दल बोलताना प्रत्येकाचाच स्वर कापरा होत होता आणि डोळे पाणावत होते. रचनेतील शब्दसौंदर्य हे हृदयाला भिडत होते आणि म्हणूनच प्रत्येकाच्याच भावना उचंबळून येत होत्या, कंठ दाटून येत होता. त्या भावनावश वातावरणाला श्री. राजेंद्र सावंत सरांनी नीलपुष्प आणि तांबे सर यांच्यावर खुमासदार रचना गुंफून आपल्या नेहमीच्या अनोख्या शैलीत साभिनय सादर करून छेद दिला आणि वातावरण थोडं हलकं-फुलकं केलं.
राजेंद्र सावंत सरांचे गीत, गायन म्हणजे अंगात ऱ्हिदम, ताल भिनल्याशिवाय राहत नाही. सौ. नंदा कोकाटे ताईंनी वर्धापन दिनानिमित्ताने संस्थेच्या जन्मापासूनचा ते आतापर्यंतची संस्थेची यशस्वी कारकीर्द याचा आढावा सादर केला. संस्थेतील प्रत्येक सदस्याला आपल्या संस्थेचा इतिहास पूर्ण माहीत असावा, याच एकमेव उद्देशाने केलेला हा प्रपंच! वर्षाताई बालगोपाल यांनी एका वेगळ्याच संकल्पनेतून आपले सादरीकरण केले.






