भूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

जलपुनर्भरणात उल्लेखनीय काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव करणार !
अटल भुजल योजना राज्यस्तरीय शिखर समितीची बैठक

धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पाटील) – राज्यातील भूजल पातळी वाढविण्यासाठी जल पुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ बनली पाहिजे असा आशावाद पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. ना. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अटल भुजल योजना राज्यस्तरीय शिखर समितीची बैठक मंत्रालयात झाली त्यावेळी ते बोलत होते.

जलपुनर्भरण करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव करणार!
ज्या ग्रामपंचायती छतावरील पाण्याचे संकलन, विहीर पुनर्भरण, विंधन विहीर पुनर्भरण याबाबतीत चांगले काम करतील अशा ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात येईल अशी माहितीही मंत्री श्री.पाटील यांनी दिली.पाणी व्यवस्थापन आराखड्याला गती द्यावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्यावे
– कृषी मंत्री दादाजी भुसे

गाव पातळीवर भूजल पुनर्भरणाच्या योजना राबविताना अभिसरण महत्त्वाचे आहे. या योजनेला महात्मा गांधी नरेगा, पाणी फाऊंडेशन व अन्य स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गती द्यावी अशी सूचना कृषिमंत्री तथा अटल भूजल योजना राज्यस्तरीय शिखर समितीचे सदस्य दादाजी भुसे यांनी केली. अटल भुजल योजनेत समाविष्ट गावांना ठिबक व तुषार अंमलबजावणीत प्राधान्य देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अटल भुजल योजनेचे सादरीकरण केले. यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे,पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह कृषी, मृद व जलसंधारण विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये ३८ तालुक्यांत १ हजार ३३९ ग्रामपंचायतींमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here