नवी दिल्ली – भारताचे माजी महान धावपटू मिल्खा सिंग यांची प्राणज्योत आज मालवली. मिल्खा सिंग यांना करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे गेल्या काही दिवसांत हॉस्पिटलकडून सांगण्यात आले होते. पण आज अखेर मिल्खा सिंग यांचे निधन झाल्याची बातमी आली. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिल्खा सिंग यांनी जिंकून दिले होते. भारताचा पद्मश्री हा किताब देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीचेही निधन झाले होते.
मिल्खा सिंग यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडे बघण्याची दृष्टी बदलली होती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो किंवा कोणत्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्या काळात मिल्खा सिंग यांचा क्रीडा विश्वात चांगलाच दबदबा होता. मिल्खा सिंग यांनी त्या काळी जे यश मिळवले त्याची तुलना कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. आतापर्यंत बरीच सुवर्णपदके त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पटकावली होती आणि क्रीडा विश्वात भारताची दखल घेण्यासाठी जगाला भाग पाडले होते. १९५८ साली झालेली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि त्यानंतर १९६० साली झाली झालेली रोमममधील ऑलिम्पिक स्पर्धा मिल्खा सिंग यांनी चांगलीच गाजवली होती.
Legendary Indian sprinter Milkha Singh dies after month long battle with COVID-19: Family spokesperson
— Press Trust of India (@PTI_News) June 18, 2021
मिल्खा सिंग यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यावर त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याचबरोबर त्यांना करोनाची लागणही झाली होती. मिल्खा सिंग यांची पत्नी निर्मला सिंग यांचे करोना व्हायरसने निधन झाले. रविवारी संध्याकाळी चार वाजता त्यांचे निधन झाले होते. करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मोहाली येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.






