काईल जेमिनसनच्या गोलंदाजीने भारतीय फलंदाजी मोडकळीस; पहिला डाव 217 धावांवर संपुष्टात

साऊथॅम्प्टन – जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सध्या इंग्लंडमध्ये खेळला जात आहे. फायनलचा पहिला दिवस पाण्याने वाया गेल्यानंतर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी न्युझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यास आलेल्या भारताचा पहिला डाव २१७ धावांवर संपुष्टात आला. भारताच्या पहिल्या डावात न्यूझीलंडच्या काईल जेमिनसनने भारतीय फलंदाजी मोडकळीस आणली.

न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताचा संघ २१७ धावांत गारद केला. तिसऱ्या दिवशी भारतीय संघानं ३ बाद १४६ वरुन पुढे खेळायला सुरुवात केली. यात आज केवळ ७१ धावांची भर टीम इंडियाला घालता आली. विराट कोहली चांगली सुरवात मिळून सुद्धा मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. तो ४४ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला ऋषभ पंत केवळ ४ धावा काढून माघारी परतला. विराटनंतर अजिंक्य रहाणेचेही अर्धशतक हुकलं. अखेर आश्विन आणि जडेजाने धावसंख्या २०० पार केली.

या डावात न्यूझीलंडच्या काईल जेमिनसनने धारदार गोलंदाजी करत ५ विकेट घेतल्या. यात कर्णधार विराट कोहलीच्या विकेटचा देखील समावेश आहे. न्यूझीलंडकडून टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी सावध सुरुवात करुन दिली. टॉम लॅथमला अश्विनने ३० धावांवर बाद करत भारताला पहिलं विकेट मिळवून दिली. लॅथम आणि कॉन्वेने पहिल्या गड्यासाठी ७० धावांची भागीदारी केली. त्यानंतर विल्यमसनच्या साथीनं डेव्हन कॉन्वेने आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

दरम्यान, टॉम लॅथम, डेव्हॉन कॉन्वे आणि कर्णधार केन विल्यमसनच्या साथीनं तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस न्यूझीलंड २ बाद १०१ धावा अशा अवस्थेत आहे. काईल जेमिनसनला दुसऱ्या बाजूनं बोल्ट आणि वॅगनरनं मोलाची साथ दिली. त्या दोघांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here