भारतीय फलंदाजांनी हाराकिरी; ९९ धावांत गमावल्या ८ विकेट्स

साऊथहॅम्पटन – जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सहाव्या व निर्णायक दिवशी भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केली. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे हे प्रमुख फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर रिषभ पंतनं चांगला खेळ करताना आशा पल्लवीत केल्या. पण, रवींद्र जडेजा व आर अश्विन या दोन अष्टपैलू खेळाडूंना त्याला साथ देता आली नाही. रिषभनेही आत्मघातकी फटका मारून स्वतःची विकेट फेकली. त्यामुळे फ्रंटसिटवर बसण्याची संधी असलेल्या टीम इंडियाला मागच्या बाकावर जाऊन बसावं लागलं आहे. आता भारतीय गोलंदाजांकडून करिष्म्याची अपेक्षा करायला हवी.

दुसऱ्या डावात भारताचा सलामीवीर शुबमन गिल अपयशी ठरला. रोहित शर्मा व पुजारानं डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु रोहितला बाद करून टीम साऊदीनं ही जोडी तोडली. सहाव्या दिवशी कायले जेमिन्सनने धक्के दिले. कोहली ( १३), पुजारा ( १५) आणि रहाणे ( १५) माघारी परतल्यामुळे टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली. पहिल्या डावातील २१७ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडनं २४९ धावा केल्या. कर्णधार केन विलियम्सन ( ४९) आणि टीम साऊदी ( ३०) यांनी दमदार खेळ केला.

न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पहिल्या सत्रात कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि उप कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या विकेट्स घेत टीम इंडियाची अवस्था ५ बाद १०९ अशी केली. रिषभ-रवींद्रनं लंच ब्रेकपर्यंत एकही विकेट पडू न देता धावसंख्या ५ बाद १३० वर नेऊन ९८ धावांची आघाडी मिळवून दिली आहे. कोहली व पुजारा माघारी परतल्यानंतर रिषभ व अजिंक्य हे चांगले खेळत होते. पण, बोल्टनं ही भागीदारी तोडली. रवींद्र जडेजा व रिषभ यांनीही संयमी खेळ केला, परंतु लंच ब्रेकनंतर निल वॅगनरनं भारताला सहावा धक्का दिला. जडेजा १६ धावांवर बाद झाला.

आता रिषभ पंतवरच सर्व मदार होती आणि आर अश्विनला सोबत घेऊन तो सावध खेळ करताना दिसला. रिषभकडून गॅबा कसोटीच्या पुनरावृत्तीची सर्वांनी अपेक्षा लावली होती. निल वॅगनर, कायले जेमिन्सन यांना रिषभला माघारी पाठवता आले नाही, म्हणून केननं ट्रेंट बोल्टला पाचारण केलं. बोल्टच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात रिषभनं टोलावलेला चेंडू हवेत उंच उडाला अन् हेन्री निकोल्सनं भन्नाट रनिंग कॅच घेतली. रिषभ ८८ चेंडूंत ४१ धावांवर माघारी परतला. त्याच षटकात बोल्टनं टीम इंडियाला आणखी एक धक्का देताना आर अश्विनला माघरी पाठवलं. मोहम्मद शमीनं झटपट १३ धावा करून वेग वाढवला, परंतु टीम साऊदीनं त्याला बाद केलं. भारताचा दुसरा डाव १७० धावांवर गडगडला अन् न्यूझीलंडसमोर आता केवळ १३९ धावांचे माफक लक्ष्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here