वर्धा (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरैशी) : पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात ही घटना घडलीय. चिमुकल्यांचा अमानुष छळ करणाऱ्या आई-वडिलांना पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली.
दोन दिवसांपूर्वी चाईल्डलाईनच्या 1098 हेल्पलाईनवर दोन लहान बहिण भावांचा वडील आणि सावत्र आईकडून छळ होत असल्याची तक्रार मिळाली. त्यावरुन चाईल्ड हेल्प लाईनच्या चमूने आर्वी तालुक्यातील गाव गाठलं. चिमुकल्यांची वडील आणि आईच्या ताब्यातून सोडवणूक करत पोलिसांत तक्रार केली.
सुरुवातीला या प्रकरणात कलम 324 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, मुलांना केलेली मारहाण पाहता कलमात वाढ करत कलम 307 सुद्धा लावण्यात आलंय. मुलाचं वय 8 तर मुलीचं वय 11 वर्ष असल्याच सांगण्यात आलंय. चिमुकल्यांचा झालेला छळ मन सुन्न करणारा आहे. मागील काही वर्षांत त्यांना सातत्यान मारहाण झालीये. त्यांच्या शरीरावरील जखमा अत्याचाराची अमानुष कहाणी सांगणाऱ्या आहेत. चिमुकल्यांना जंगलात सोडण्याचा निदर्यीपणाही केला गेला.
सध्या दोन्ही मुले हे वर्धेच्या बालगृहात आहेत. यांचं येथे समुपदेशन करत त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता या बालगृहात जिल्हाधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी भेट देत मुलांची विचारपूस केलीय. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत मुलांचे वडील अन सावत्र आईला अटक केलीये.



