खासदार संभाजीराजेंनी सुचवले दोन पर्याय; पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : ‘मराठा आरक्षण प्रश्नावर केंद्र सरकारने आता आपली भूमिका स्पष्ट करावी. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही हे सांगावं लागेल. राज्य सरकार फार तर शिफारस करु शकते. त्यामुळं केंद्र सरकारने वटहुकूम काढुन घटनादुरुस्ती करावी,’ अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. मराठा आरक्षणासंबंधी केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर संभाजीराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘मराठा आरक्षणासाठी आता केवळ दोनच मार्ग आहेत. १०२वी घटनादुरुस्ती ही राज्याचे अधिकार अबाधित आहेत असं केंद्रानं पुर्नविचार याचिकेत म्हटलं होतं. पण सर्वोच्च न्यायालयाने ते फेटाळलं. त्यामुळं राज्याला आता काही अधिकार राहिले नाहीत असा अर्थ होतो,’ असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

‘मागासवर्ग आयोग तयार करुन, गायकवाड अहवालातील त्रुटी दूर करुन सर्व डेटा गोळा राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींकडे द्यायचा. मग राष्ट्रपती त्यांना वाटलं तर ३४२ अ नुसार केंद्रीय मागास आयोगाला पाठवू शकतात, मग ते राज्य मागास आयोगाला पाठवतील, मग राष्ट्रपतींना पटलं तर संसदेला देऊ शकतात,’ असा एक मार्ग संभाजीराजेंनी सुचवला आहे.

‘केंद्र सरकारने वटहुकूम काढावा. वटहुकूम काढल्यानंतर घटनादुरुस्तीशिवाय पर्याय राहत नाही. घटना दुरुस्ती झाल्यावर राज्याला अधिकार मिळेल. राज्याची भूमिका संपली असून आता केंद्र सरकारला लवकरात लवकर भूमिका स्पष्ट करावी लागेल. मराठ्यांना आरक्षण द्यायचं का नाही ते आता केंद्र सरकारनं ठरवावं. राज्य फक्त आता शिफारस करु शकेल. त्यामुळे आता केंद्राची जबाबदारी आहे,’ असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here