कल्याण (प्रकाश संकपाळ) – गणेश उत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण आहे. मुंबई व पुणे सारख्या शहरात राहणारे चाकरमणी हे आपापल्या गावी गणपती उत्सवासाठी जात असतात.गणपती उत्सव हा पारंपारिक पध्दतीने कोकणात साजरा केला जातो. कोकणात प्रत्येकाच्या घरोघरी गणपतीची मूर्ती आणली जाते. कोकणात ५ ते १० किलोमीटर अंतरावरुन गणपतीमूर्ती आणाव्या लागतात. चाकरमानी नोकरी धंद्यानिमित्त शहरात असल्याने गावात वयोरुद्ध व्यक्ती राहतात तर काही घरे बंद असून मुंबई-पुणे सारख्या शहरातून ते आपल्या गावी जातात यामुळे त्यांना स्व:ता गावी जाऊन गणपती उत्सवाची तयारी करावी लगाते. ते गावी गेल्याशिवाय त्यांच्या घरी गणपती सण साजरा होऊ शकत नाही.
परंतु या वर्षी कोरोना सारखा घातक विषाणुचा संसर्ग वाढत असल्याने मुंबई व पुणे अशा ठिकाणी अनेक लोक अडकून आहेत.अशा काळात त्याना गावी जाण्यासाठी पास सुद्धा उपलब्ध होऊ शकले नाही . आणि जे गावी गेले त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. ४ महिन्यांहुन अधिक काळ लॉकडाउन असल्यामुळे सामान्य लोकांकडे पैसे सुद्धा राहिलेले नाहीत त्यामुळे ते खासगी कार घेऊन सुद्धा जाऊ शकत नाहीत.म्हणून आता तरी किमान गणपती उत्सवासाठी तरी त्यांना सुखरूप त्यांच्या मूळगावी जाता यावे. त्यासाठी सरकारने योग्य ती व्यवस्था करावी.
गणेश उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे,परंतु शासनकडून स्पष्ट निर्णय होत नसल्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई, रायगड,बोरिवली,अशा अनेक शहरात राहणाऱ्या कोकणवासीयांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. हा निर्णय वेळीच झाला नाही तर कोकणवासीयांचा संयम तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले तर कोकणवासीय मोठ्या झुंडीने कोकणात जायला निघतील त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती जास्त प्रमाणात आहे.आज पर्यंत सरकारच्या आदेशाचे पालन करुन जनता सहकार्य करीत आहे. त्यामुळे आता त्यांना गावी जाण्यासाठी लवकर लवकर एस.टी सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी पोलीस सेवा संघटनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख अनंत हुमणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.








