ऑलिंम्पिक : भारतीय नेमबाजांनी पुन्हा निराश केले, आता सांघिक प्रकारातही अपयश

टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला नेमबाजीतून सर्वाधिक पदके मिळण्याची आशा होती. पण या प्रकारात भारताला अद्याप एकही पदक मिळवता आले नाही. जागतिक क्रमवारीत क्रमांक एक आणि दोन वर असलेल्या अभिषेक वर्मा आणि सौरभ चौधरी यांना अपयश आल्याने भारताला मोठा धक्का बसला.

याआधी वैयक्तीक १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात देखील पुरुषांमध्ये सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा यांना तर महिलांमध्ये यशस्विनी देसवाल, मनू भाकर यांना अपयश आले होते. वैयक्तीक प्रकारात अपयशी ठरलेल्या भारतीय नेमबाजांनी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात देखील निराशा केली. भारताच्या सौरभ चौधरी आणि मनू भाकर या जोडीने स्टेज १ मध्ये अव्वल स्थान मिळून पदकाच्या आशा निर्माण केल्या होत्या. पण स्टेज २ मध्ये ते सातव्या स्थानावर फेकले गेले आणि भारत पदकाच्या शर्यतीतून बाहेर झाला.

१० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात स्टेज एक मध्ये सौरभ चौधरीने धमाकेदार कामगिरी केली. त्याने ९८,१००, ९८ असे एकूण २९६ गुण मिळवले तर त्याची जोडीदार मनू भाकरने ९७, ९४,९५ सह २८६ गुण मिळवले. या जोडीने ५८२ गुणांसह स्टेट १ मध्ये अव्वल स्थान मिळवले. स्टेज १ मध्ये भारताची दुसरी जोडी अभिषेक वर्मा-यशस्विनी देसवाल यांना मात्र अपयश आले. या जोडीला १५व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

स्टेज २ मध्ये सौरभ आणि मनू यांची सुरुवात थोडी खराब झाली होती. त्यानंतर सौरभने चांगले गुण मिळवले. पण स्टेज १ प्रमाणे त्यांना अव्वल कामगिरी करत आला नाही. ही जोडी ३८० गुणांसह सातव्या क्रमांकावर राहिली. यामुळे भारताच्या पदक मिळवण्याची आशा संपुष्ठात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here