आदिवासींनी भीतीने काढली रात्र जागून
अलिबाग-सोगावकर – : शनिवार दि.३१जुलै रायगड जिल्ह्यातील महाड तळई येथे काही दिवसांपूर्वी दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी झाली.
अलिबाग तालुक्यातील मापगांव ग्रामपंचायत हद्दीतील सोगाव येथील आदिवासी वाडीवर ३०जुलै संध्याकाळच्या सुमारास मातीचा काही भाग कोसळला, सुदैवाने जीवितहानी होता होता राहीली, आदिवासींची घरे डोंगर उतारावर असल्याने माती काही प्रमाणात घराच्या पाठीमागे येऊन भिंतीवर धडकली,अजूनही माती कोसळण्याच्या स्थितीत आहे, अतिशय महत्वाचे म्हणजे आदिवासींच्या घरांच्या वरच्या बाजूस डोंगरावर आर.सी. एफ. कारखान्याला वीजपुरवठा करणारा टॉवर उभा केलेला आहे,त्यालासुद्धा धोका निर्माण झाला आहे, यामुळे जर दुर्घटना घडल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदरची घटना घडल्यानंतर ताबडतोब मापगांव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, तलाठी संतराम हांगे, ग्रामसेवक,अलिबाग पोलीस ठाणे निरीक्षक श्री. कोल्हे साहेब,मापगांव ग्रामपंचायत सर्वेसर्वा श्री. सुनिल आप्पा थळे,तंटामुक्ती अध्यक्ष विवेक जोशी,सोगाव पोलीस पाटील, बहिरोळे पोलीस पाटील प्रफुल्ल थळे, आदींनी पाहणी करून माहिती घेतली,तसेच युवा नेते सूचित थळे व त्यांचा मित्रपरिवार घटना घडल्यापासून रात्री उशिरापर्यंत योग्य प्रकारे खबरदारी घेत होते. शनिवारी ३१ जुलै रोजी सकाळी अलिबाग गटविकास अधिकारी दिप्ती देशमुख,यांनी मापगाव ग्रामसेवक,तसेच सूचित थळे यांच्यासोबत घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे.

मापगांव तलाठी यांनी सविस्तर माहिती देतांना सांगितले की, आदिवासींची घरे ही डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या ठिकाणी आहेत, या सदर आदिवासी वाडीवर १५च्या जवळपास कुटुंब आहेत,याठिकाणी राहणारी सुमारे ६० ते ७० लोकसंख्या आहे, त्यातील काही लोक कामानिमित्त परगावी गेलेले आहेत, यांची घरे धोक्याचे ठिकाणी आहेत,सध्या हलविणे शक्य नसले तरी त्यांची तात्पुरती जेवणाची व निवासाची सोय करण्यात येत आहे.
तहसीलदारांना ताबडतोब कळविण्यात आले आहे, त्यांनी अतिवृष्टीच्या हवामान अंदाजामुळे खबरदारीची पावले उचलत तात्काळ आदिवासी वस्तीमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करून त्यांना तात्पुरता सुरक्षित निवारा तसेच त्यांच्या जेवण इ.ची सोय करण्याचे आदेश पारित केले आहेत,तसेच संबंधित स्थळाची पाहणी करण्यासाठी पोलिस पथक रवाना केले आहे.
ग्रामपंचायत सर्वेसर्वा श्री. सुनिल आप्पा थळे यांनी माहिती देतांना सांगितले की, ज्या आदिवासींच्या घराजवळ डोंगराच्या मातीचा ढिगारा आला आहे, त्याठिकाणी फक्त २ वयोवृद्ध व्यक्ती राहत आहेत, त्यांना त्वरित सुरक्षित स्थळी हलविले आहे, अन्य घरांना तसा धोका सध्यातरी नाही आहे, तशीच परिस्थिती निर्माण झाली तर मापगांव ग्रामपंचायत मार्फत आम्ही सर्व बाधीत आदिवासींची निवासाची व जेवणाची मराठी शाळा व धर्मशाळेत व्यवस्था केलेली आहे, असे शेवटी सांगितले आहे.






