भारतीय महिला हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत गाठली उपांत्य फेरी

टोकियो : जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताच्या महिला हॉकी संघाने आज इतिहास रचला. भारताने उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाचा १-० असा पराभव केला. या विजयासह भारतीय संघ पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्याचबरोबर सुवर्णपदकापासून आता फक्त दोन पावले दूर आहे.

भारताच्या महिला हॉकी संघाने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत एकदाही प्रवेश केलेला नव्हता. भारताच्या महिला हॉकी संघाने १९८० साली आपली सर्वोत्तम कामगिरी करत चौथा क्रमांक पटकावला होता, त्यावेळी स्पर्धेत सहा संघ होते. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची भारतीय महिला हॉकी संघाची ही तिसरी वेळ आहे. आतापर्यंत १९८०, २०१६ आणि आता २०२१-२२ या तीन ऑलिम्पिक्समध्ये भारताने प्रवेश केला आहे.

पहिला गोल झाल्यावर काही वेळातच भारतीय संघाला मोठा धक्का बसला. कारण भारताच्या मोनिका मलिकला यावेळी ग्रीन कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे तिला मैदानातून बाहेर जावे लागले आणि भारतीय संघावर १० खेळाडूंनिशी खेळण्याची पाळी आली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला हॉकीमधील उपांत्यपूर्व फेरीचा सामना चांगलाच रंगला. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला, पण यावेळी त्यांना संधीचे सोने करता आले नाही. दोन्ही संघांनी सामन्याच्या पहिल्या १५ मिनिटांमध्ये गोल करण्याचे प्रयत्न केले, पण त्यांना अपयश आले. भारताने यावेळी उत्तम बचाव केल्याचेही पाहायला मिळाले. कारण ऑस्ट्रेलियाला यावेळी गोल करण्याच्या काही संधी आल्या होत्या, पण भारताच्या उत्तम बचावामुळे त्यांना गोल करता आला नाही. या सामन्यात पहिला गोल केला तो भारतीय संघाने. सामन्याच्या २२ व्या मिनिटाला भारताने गोल करत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली होती. भारताच्या गुरजित कौरने हा गोल केला होता.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here