नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) : दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईत एपीएमसी मार्केट परिसरात माथाडी चौकाजवळ कोपरीगावाकडे जाणाऱ्या गटारीत निळ्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पुरुष मृतदेहाचे तुकडे आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, केवळ हातावर रविंद्र नावाच्या टॅटूवरून पोलिसांनी आपली चक्रे फिरवली आहेत. दोन दिवसातच पोलिसांनी घणसोली परिसरातून सुमित कुमार चव्हाण नामक इसमाला ताब्यात घेतले आहे. या घटनेत आणखी किती जणांचा समावेश आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.
आरोपी सुमित कुमार चव्हाण याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीने शीर आणि धड दुसऱ्या ठिकाणी फेकले आहे. पोलिस आरोपीला घेऊन संपूर्ण मृतदेह गोळा करत आहेत. संपूर्ण अवयवांचे तुकडे-तुकडे असल्याने मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे जोरदार प्रयत्न सुरु होते. संबंधित मृतदेह हा ३० ते ३५ वयाच्या व्यक्तीचा असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह वाशी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. तर मृतदेह नेमका कुणाचा आहे? याचा तपास पोलीस करत होते. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता.
रवी उर्फ रवींद्र कोपरी गावात राहत होता. तीन दिवसांपूर्वी रविंद्र घरी न परतल्याने नातेवाईकांनी कोपरखैरने पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार दोघे एकमेकांना ओळखत होते आणि पैशाच्या वादातून आरोपीने असे कृत्य केले. पोलिसांनी घणसोलीमधून सुमित कुमार चव्हाणला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा पोलीस तपास करीत आहेत. अद्याप मृतदेहाचे शीर आणि धड मिळाले नाही.






