वारसा हक्काच्या नोंदीसाठी घेतली चार हजारांची लाच घेतांना एकास अटक

अहमदनगर (प्रतिनिधी) : संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी येथील तक्रारदार यांच्या आजोबांच्या मृत्यपत्रानुसार वडील व चुलते यांच्या वारसा हक्काची नोंद सातबारा उताऱ्याला करण्यासाठी कामगार तलाठी स्वाती बबनराव झुरळे यांच्याकडे अर्ज दिला होता. मात्र, तलाठी झुरळे हे वारसा हक्काची नोंद करण्यासाठी टाळाटाळ करत ती नोंद करण्यासाठी कोतवाल संदीप तांबे यांच्यामार्फत चार हजार रुपयांची १३ सप्टेंबर रोजी मागणी केली.

वारंवार विनंती करूनही नोंद होत नसल्याने तक्रारदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरून शुक्रवारी दुपारी पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ, पोलीस निरीक्षक मीरा आदमाने, पोलीस नाईक नितीन कराड, प्रभाकर गवळी, प्रवीण महाजन, संदीप गांगुर्डे यांनी सापळा लावला असता कोतवाल संदीप तांबे यास लाच घेताना ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चार हजार रुपये रोख मिळून आले. त्याची चौकशी केली असता कामगार तलाठी स्वाती झुरळे यांचे ते पैसे असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. आश्वी पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here