शहादा (प्रतिनिधी) : तालुक्यातील सारंगखेडा येथील तापी नदीवरील असलेला पूल अखेरच्या घटका मोजत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सारंगखेडा ते टाकरखेडा या दरम्यानच्या पुलाची अगोदरच असलेले खिळखीळी असलेली अवस्था काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे अधिकच बिकट झाली आहे. पुलाखाली असलेला टाकरखेडा भागाकडील सपोर्ट पिचिंग भरावच वाहून गेल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे.
तापी नदीवरील सारंगखेडा ते टाकरखेडा दरम्यानच्या पुलाची अनेक वर्षापासून बिकट अवस्था झाली आहे. काल (ता.२८) रात्री या भागात अतिवृष्टी झाल्याने टाकरखेडाकडील पुलावरील सपोर्ट पिचिंग भराव वाहून गेला आहे. या भरावाचे पाच वर्षात दोन वेळा काम केले होते. यात लाखों रूपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र तरीही भराव वाहून गेला. त्यामुळे शासनाचे लाखों रूपये पाण्यात गेले असून हा पुल शेवटच्या घटका मोजत असल्याचे यातून चित्र निर्माण झाले आहे.
पुलाच्या टाकरखेडाकडील भराव वाहून गेल्याचे सकाळी लक्षात आल्यावर तसे फोटो दिवसभर सोशल मिडीयावर व्हायरल झाले. त्यावरून मनसेचे रस्ते आस्थापनाचे उपाध्यक्ष राकेश पेडणेकर यांनी जिल्हाधिकारी, बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग नाशिक, तहसीलदार यांना माहीती दिली. या विभागांनी सारंगखेडा पुलावर येऊन पाहणी केली.






