आशियातील पहिले नोबेल पारितोषिक मिळविणारे – गुरुदेव रविंद्रनाथ टागोर

– योगेश शुक्ल (९६५७७०१७९२)
ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मो पंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार,बंगाली कवी,संगितकार, १९व्या शतकाच्या उत्तरार्धात व २०व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगितात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियाचे पहिले नोबेलविजेते गुरुवर्य रविंद्रनाथ टागोर यांचा ७ ऑगस्ट हा स्मृतिदिन.
बंगाली साहित्याची रवींद्रपूर्व व रवींद्रोत्तर अशी विभागणी करण्यात येते; यावरून बंगाली साहित्यावरील रवीन्द्रनाथांचा प्रभाव लक्षात यावा. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहाला 1912 या वर्षी साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्यानंतर कोणत्याही भारतीय लेखकास हा मान मिळालेला नाही. यावरूनच रवींद्रनाथ टागोर यांचे मोठेपण सिद्ध होते. . गुरुदेव टागोर यांना चित्रकला, शिक्षण आदी क्षेत्रांतही चांगली गती होती, जाण होती आणि त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव कार्येही केली. टागोर यांनी काव्यप्रकार हाताळण्याबरोबरच ‘नौकाडूबी‘, ‘गोटा‘ यांसारख्या कादंबऱ्या, ग्रंथ, नाट्यलेखन, साहित्यशास्त्र, भाषाशास्त्र, भौतिकशास्त्र आदी. विषयांतही त्यांनी व्यापक लेखन व ग्रंथनिर्मितीही केली.
कोलकात्याच्या जोराशंका ठा़कूर बाडी येथे रवींद्रनाथ टागोर (टोपणनावः रवि) यांचा जन्म 7 मे 1861 रोजी झाला वडील देवेन्द्रनाथ टागोर(१८१७-१९०५) व आई शारदा देवी (१८३० – १८७५) यांच्या १४ अपत्यांमध्ये रवींद्रनाथ हे १३वे होते.११व्या वर्षी मुंज झाल्यावर रवींद्रनाथांनी वडीलांसोबत १४ फेब्रु. १८७३ रोजी भारतभ्रमणार्थ कलकत्ता सोडले. या भ्रमंतीत त्यांनी विविध जागा पाहिल्या. यात होते वडलांची शांतिनिकेतन मालमत्ता (जेथे आजचे विश्वभारती विद्यापीठ आहे), अमृतसर व हिमालयातील थंड हवेचे ठिकाण डलहौसी इत्यादी. येथे रवींद्रनाथांनी विविध व्यक्तींची आत्मचरित्रे वाचली, इतिहास, खगोलशास्त्र, विज्ञान , कालीदासाचे काव्य व संस्कृत आदींचे अध्ययन केले. १८७७ साली प्रकाशित झालेल्या रचनांमुळे रवींद्रनाथ प्रथम लोकांसमोर आले. यात होत्या मैथिली कवी विद्यापतीप्रवर्तित शैलीत रचलेल्या काही दीर्घ कविता. विनोदाने रवींद्रनाथांनी प्रथम ह्या भानुसिंह नामक वैष्णव कवीने १७व्या शतकात रचलेल्या व नंतर गहाळ झालेल्या रचना आहेत, असा आविर्भाव केला व नंतर त्यांचे कवीत्व मान्य केले. याच काळात त्यांनी संध्या – संगित(१८८२), बंगाली भाषेतील पहिली लघुकथा “भिकारिणी” व सुप्रसिद्ध कविता “निर्झरेर स्वप्नभंग” आदी रचना लिहिल्या.
कोलकात्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवीन्द्रनाथांनी प्रथम कविता वयाच्या ८व्या वर्षी लिहिली. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने ब-याचशा कविता लिहिल्या. शांतीनिकेतनाची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवीन्द्रसंगीताचे सृजन हे रवीन्द्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होय. रवीन्द्रनाथांनी रचलेली जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवीन्द्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत. पारंपारिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला.
बॅरिस्टर होण्यासाठी त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज येथे प्रवेश घेतला परंतु १८८० मध्ये कोणत्याही पदवीशिवाय ते बंगालला परतले. ९-नोव्हे.-१८८३ रोजी त्यांनी मृणालिनी-देवी(जन्मनावः भाबतारिणी १८७३-१९००)यांच्याशी विवाह केला. या विवाहापासून त्यांना पाच अपत्ये (पैकी दोघांचा बालमृत्यु) झाली. १८९० साली रवींद्रनाथांनी सध्याच्या बांग्लादेशातील सियाल्दा येथील ठाकूर घराण्याची मालमत्ता सांभाळण्यास सुरुवात केली. त्यांची पत्नी व मुले १८९८ साली येथे त्यांच्या सोबत आली. या काळात ते जमिनदार बाबु या नावाने ओळखल्या जात होते. हा काळ रवींद्रनाथांचा “साधना काळ” म्हणून ओळखला जातो. गल्पगुच्छ (मराठी अर्थ: कथा-गुच्छ) नावाचा ८४ कथा असलेली तीन खंडी रचना सिद्ध केली. आवेग व विरोधाभासयुक्त असे ग्रामीण बंगालचे सुरेख चित्र यात रवींद्रनाथांनी रेखाटले आहे.
शांतिनिकेतन (१९०१ – १९३२)
१९०१ साली रवीन्द्रनाथ सियाल्दा सोडून शांतिनिकेतन येथे राहण्यास आले. उद्देश होता एका आश्रमाची स्थापना. या आश्रमात त्यांनी एका प्रार्थना-गृहाची, प्रयोग-शील शाळेची, बागबगिचा व ग्रंथालयाची स्थापना केली. रवीन्द्रनाथांच्या पत्नीचा व दोन मुलांचा मृत्यु येथेच झाला. त्यांच्या वडिलांचे देहावसान १९-जाने-१९०५ ला घडले व वारसदार म्हणून त्यांना नियमित मासिक उत्त्पन्न मिळू लागले. याशिवाय त्यांना त्रिपुराचे महाराजांकडून आर्थिक साहाय्य, कौंटुबिक दागदागिने व पुरी,ओरिसा येथिल बंगला विकून काही प्राप्ती झाली. या काळात त्यांचे साहित्य बंगाली व विदेशी वाचंकांचे आधिकाधिक लक्ष खेचु लागले होते. नैवेद्य (१९०१) व खेया (१९०६) या रचना या काळात प्रकाशित झाल्या. याशिवाय कवितांचा free verse या नावाने अनुवाद करणेही सुरु होते. १४-नोव्हे.-१९१३ रोजी स्वीडीश अकादमीचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाल्याची बातमी रवीन्द्रनाथांना समजली. गीतांजली या रचनेबदद्ल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. गीतांजलीचे भाषांतर स्वतः रवीन्द्रनाथांनीच केले होते. १९१५ साली त्यांना ब्रिटीश सरकारने “सर” ही पदवी दिली. १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ती सरकारला परत केली.
१९२१ साली रवीन्द्रनाथ व कृषी-अर्थतज्ञ लिओनार्ड के एल्महिर्स्ट् यांनी शांतिनिकेतनजवळील सुरुल येथे एका ग्रामीण पुनर्निर्माण संस्थेची स्थापना केली. याच संस्थेचे रवीन्द्रनाथांनी पुढे “श्री-निकेतन” असे नामकरण केले. श्री-निकेतनच्या माध्यमातून महात्मा गांधींच्या प्रतिकात्मक स्वराज्य चळवळीला पर्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. ज्ञानसंवर्धनातून अज्ञानी व असहाय्य ग्रामीण भागाची सुटका होईल या उदेशाने त्यांनी विविध देशातील विद्वान, दाते व अधिका-यांस या उपक्रमात सहभागी करुन घेतले. १९३० सालापासून त्यांनी भारतातील पराकोटीच्या जातीयेतेविरुद्ध प्रचार सुरु केला. नाट्य-कविता यांद्वारे जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. केरळच्या गुरुवायुर मंदिरात दलितांना प्रवेश देण्यासाठी त्यांनी आवाहन केले.
रविंद्रनाथकालीन भारतामध्ये सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक चळवळींचे प्रमुख केन्द्रांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राचा प्रभाव रवींद्रनाथांवरही पडला होता. संत तुकारामांच्या साहित्याचा त्यांनी अभ्यास केला होता. संत तुकारामांचे काही अभंग त्यांनी बंगाली भाषेत अनुवादित केले आहेत.
रविंद्रनाथ अनुवादित तुकारामांचे अभंग.
कारवार येथील सृष्टीसौन्दर्यामुळे रवींद्रनाथांना आपल्या पहिल्या नाटकाची प्रेरणा मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनही त्यांच्या साठी प्रेरणास्थान होते. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी एक खंडकाव्यही रचले आहे. रविन्द्रनाथांचा नेता व क्रांतीकारक या रुपात भारतीय स्वातंत्र्य संग्रामात थेट सहभाग नव्हता म्हणून व त्यांच्या संस्कृतीपिपासू वृत्त्तीमुळे त्यांच्यावर महाराष्टात टीका झाली होती. रविन्द्रनाथांच्या व्यक्तीमत्वाने काही महाराष्ट्रीयही प्रभावित झाले होते. रवीन्द्रसाहित्य मुळ बंगालीतून वाचण्याच्या इच्छेने पु.ल.देशपांडे यांनी बंगाली भाषा शिकली. मराठी व कानडी भाषेत लेखण केलेले व कानडी भाषेतील आधुनिक साहित्यातील सर्वश्रेष्ठ कवी व जन्माने महाराष्ट्रीय असलेल्या द.रा.बेन्द्रे यांच्या साहित्यावरही रविंद्रनाथांचा प्रभाव आहे.
पारंपारिक हैदा कोरिवकाम शैलीतील बंगाली लिपीतील रवींद्रनाथांची आद्याक्षरे “र-ठ” रवींद्रनाथ स्वतःची हस्तलिखिते अनेकदा अशा कलेने सजवत असत.
संगीत,साहित्य, तत्वज्ञान, चित्रकला ,नृत्य,शिक्षण अशा बहुविध क्षेत्रात रविंद्रनाथांनी संचार केला. संख्या व दर्जा या दोन्ही कसोट्यांवर रविंद्रनाथांची निर्मिती उतरते.
रविंद्रनाथाच्या बहुमुखी निर्मितीत कविता जरी प्रमुख असली तरी त्यांनी कादंब-या, निबंध, लघुकथा, प्रवासवर्णने, नाटके अशा बहुविध साहित्याची निर्मिती केली.यमकयुक्तता, आशावाद व गेयता ही त्यांच्या कृतींची प्रमुख वैशिष्ट्ये. कवितेनंतर रविंद्रनाथांची लघुकथा प्रमुख रचना मानली जाते.रविंद्रनाथ हे बंगाली भाषेतील आद्य लघुकथाकार. सामान्य माणसांचे जीवन हा त्यांच्या कथांचे कथाबीज आहे.
काव्य
१५-१६ व्या शतकातील वैष्णव रचनांचा रवींद्रनाथांवर प्रभाव होता. भारतीय परंपरेतील ‘ऋषी’ संकल्पनेचा ही रवींद्रनाथांच्या व्यक्तीमत्वावर प्रभाव दिसून येतो.गावोगावी गीत गात फिरणा-या फकिरसदृश ‘बाऊल’ कलाकारांची ग्रामीण बंगालमध्ये परंपरा आहे. बाऊल स्वतःस कोणत्याही एका धर्माचे मानत नाहीत. त्यांच्या गीतांत हिंदू, मुस्लिम अशा दोन्ही धर्माची शिकवण दिसून येते. पारंपारिक रवींद्रनाथांनी या परंपरेस बुद्धीजीवी वर्तुळात पूर्वी नसलेली प्रतिष्ठा दिली. त्यांची बाऊल परंपरेच्या अभ्यासाने त्यांच्या स्वतःच्या काव्यकृतीस नवा आयाम मिळाला. ‘मनेर मानुष’ (मनातील माणूस) आणि ‘जीवन देवता’ ही दोन रुपके टागोरांच्या कवितेत ब-याचदा दिसतात.
गीतांजलीतील चौथ्या कवितेचे (शीर्षकः प्रार्थना) मराठी भाषांतर
विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर
ही माझी प्रार्थना नाही;
विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये
एवढीच माझी इच्छा|
दु:खतापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे
तू सांत्वन करावेस अशी माझी अपेक्षा नाही.
दु:खावर जय मिळवता यावा
एवढीच माझी इच्छा|
जगात माझे नुकसान झाले
केवळ फसवणूक वाट्याला आली;
तर माझे मन खंबीर व्हावे
एवढीच माझी इच्छा|
माझे तारण तू करावेस वा मला तारावेस ही माझी प्रार्थना नाही.
तरुन जाण्याचे सामर्थ्य माझ्यात असावे
एवढीच माझी इच्छा|
माझे ओझे हलके करुन
तू माझे स्वांत्वन केले नाहीस तरी माझी तक्रार नाही
ते ओझे वाहायची शक्ती मात्र माझ्यात असावी
एवढीच माझी इच्छा|
सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन
मी तुझा चेहरा ओळखावा
दु:खांच्या रात्री जेव्हा, सारे जग फसवणूक करील,
तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका मात्र निर्माण होऊ नये, एवढीच माझी इच्छा|
कादंबर्‍या व इतर साहित्य
रवींद्रनाथांनी ‘चतुरंग’, ‘शेषेर कबिता’ (शेवटच्या कविता), ‘चार अध्याय’, ‘नौका डुबी’, ‘घरे बाईरे’ या सारख्या ४ लघुकांदब-या व ८ कादंब-या लिहिल्या. ‘चतुरंग’ ही सचिश नावाच्या परस्परविरोधी संकल्पनांत अडकलेल्या पात्राची कहाणी आहे. धार्मिक गूढतेतून आयुष्याचा अर्थ शोधणार्‍या कथानायकाचा अंती होणारा भ्रमनिरास टागोरांनी या कादंबरीतून मांडला आहे. गोरा कांदबरीतील मुख्य पात्र पारंपारिक हिंदू सनातनी मताचे समर्थक आहे. ह्या गौरवर्णीय पात्र व इतर पात्रातील संवादातून ही कांदबरी उलगडत जाते.सनातनी गोर्‍याच्या विचारामुळे त्याचे सनातनी वडिल प्रभावित होत नाहीत. धर्मांधता ही श्रद्धेमुळे नव्हे तर व्यक्तीच्या उग्र प्रकृतीने बनते असे टागोर या कादंबरीतून सांगतात. ‘शेषेर कबिता’ (शेवटच्या कविता) ही कवितेने नटलेली कादंबरी. ‘रवींद्रनाथ ठाकूर’ या स्वतःचेच नाव सांगणार्‍या ‘प्रसिद्ध कवी’वर टागोर त्रयस्थपणे यातून टीका करतात. ‘चार अध्याय’ ही रवींद्रनाथांची शेवटची कांदंबरी. ‘राष्ट्रभक्ती’ म्हणजे काय?, राष्ट्र कसे बनते?, केवळ घोषणाबाजी, कठोर शिस्त यातून खरे स्वातंत्र्य शक्य आहे काय? अशा प्रश्नांचा धांडोळा ही कादंबरी घेते.
रवींद्रसंगीत
रवींद्रनाथांनी रचलेल्या व चाल दिलेल्या जवळपास २२३० गीतांना एकत्रितपणे रवींद्रसंगीत (बंगाली :রবীন্দ্র সংগীত}} असे संबोधले जाते. गगनेर खाले रबि चन्द्र दीपक ज्बले हे रवींद्रनाथांनी रचलेले पहिले व हे नूतन देखा दिक आरो बारो हे शेवटचे गीत मानन्यात येते. भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते असलेल्या जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना मूलतः रवींद्रसंगीताचा हिस्सा आहेत. सांगितिकदृष्ट्या अभिजात भारतीय संगीत, बंगाली लोकसंगीत व अभिजात पाश्चात्य संगीत ह्या रवींद्रसंगीताच्या प्रेरणा मानल्या जातात. अभिजात भारतीय संगीतातील ठुमरी शैलीचा रवींद्रसंगीतावर मुख्य प्रभाव आहे. ही गीते रवींद्रनाथांच्या स्वतःचे तत्वचिंतन दाखवत असली तरी त्यावर वैष्णव व उपनिषदीय तत्वज्ञानाचीही झलकही दिसते. रवींद्रसंगीतातील गीते ही विविध रागांमध्ये बांधण्यात आली असून रागाचा व गीताचा भाव यात सुसंगती असते. अनेक गीतांमध्ये विविध रागांना एकत्र बांधून नवसृजन केलेले दिसते. अभिजात भारतीय संगीतातून प्रेरणा घेतलेल्या रवींद्रसंगीत हे नंतर अनेक अभिजात भारतीय संगीताच्या गायकवादकांचे प्रेरणास्त्रोत ठरले. रवींद्रसंगीताने प्रभावित गायक-वादकात विलायत खान (सतार), अमजद अली खान (सरोद]) आदींचा समावेश आहे.
चित्रकला
वयाच्या ६० च्या वर्षी रवींद्रनाथांनी चित्रे काढण्यास सुरुवात केली. द. फ्रान्स मधील कलाकारांच्या प्रेरणेवरुन त्यांच्या चित्रांची पॅरिस मधील पहिल्या प्रदर्शनासह युरोपभर अनेक प्रदर्शने झाली. आयुष्याच्या या काळात रवींद्रनाथांना रंगांधळेपणाचा त्रास सुरु झाला होता. सौन्दर्यदृष्टी व रंगछटांमध्ये रवींद्रनाथांच्या चित्रशैलीची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. रवींद्रनाथांनी रचनेत वेगवेगळ्या शैलींचे अनुसरण केले. यात उत्तर आयर्लॅडमधील मलनगान कारागिरीपासून कॅनडाच्या हैदा कोरिवकाम प्रकारापर्यंतच्या चित्र व शिल्पकलेतील शैली येतात. आपल्या कृतींची हस्तलिखितेही अनेकदा रवींद्रनाथांनी कलाकारीने सजवली आहेत.
नाट्य
वयाच्या विसाव्या रवींद्रनाथांनी ‘वाल्मिकी प्रतिभा’ नावाचे पहिले नृत्य-नाट्य लिहिले. यात भजनांच्या स्वरुपात असलेले पारंपारिक बंगाली कीर्तन व युरोपीय गीत-शैलींचा संमिश्र वापर केला आहे.ऐहिक सुखोपभोगांपासून पारमार्थिकाकडे हा विषय डाकघर नावाच्या नाटकात रवींद्रनाथांनी हाताळला आहे. ‘अभिनयापेक्षा भावनांवर भर’ असे रवींद्रनाथ स्वतःच्या नाटकांचे वर्णन करतात. ‘चंडालिका’, ‘विसर्जन’, चित्रगंदा’, ‘राजा’, ‘मायार खेला’ ही रवींद्रनाथांची इतर नाटके. नाटकांसोबत टागोरांच्या ‘नृत्य-नाटिका’ विशेष प्रसिद्ध आहेत. मणिपुरी शैलीच्या अभिजात नृत्य शैलींचा टागोरांनी वापर केला आहे.
लघु कथा
‘गल्पगुच्छ'(कथागुच्छ) नावाचा रवींद्रनाथांचा ८४ लघुकथांचा ३ खंडी संग्रह प्रसिद्ध आहे. आजूबाजूचा परिसर,आधुनिक कल्पना व बौद्धिक कूटप्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न टागोर यांतून करतात. ‘काबुलीवाला’ या सुप्रसिद्ध प्रथमपुरुषी कथेत दूरदेशी असलेल्या आपल्या मुलीची आठवण कशी येत राहते हे अफगाण फळवाल्याच्या तोंडून टागोर सांगतात.
राजकीय मते
चरखा-पंथी असे संबोधून त्यांनी तत्कालिन स्वदेशी चळवळीची खिल्ली उडवली होती. ब्रिटिश साम्राज्यवादापेक्षाही ‘सामाजिक अनारोग्य’ त्यांना मोठा शत्रु वाटत असे. स्वयंसहायता व सर्वसामान्यांचा बौद्धिक उद्धार आदींवर त्यांचा जास्त भर होता. आंधळ्या क्रांतीपेक्षा सावकाश होणा-या शैक्षणिक उत्क्रांतीवर त्यांचा जास्त विश्वास होता. या मतांमुळे रवींद्रनाथांना शारिरिक हल्ल्यांना सामोरे जावे लागले. १९१९ च्या जालियनवाला बाग हत्यांकाडाचा निषेध म्हणून त्यांनी ब्रिटिश सरकारची सर्वोच्च पदवी परत केली. टागोरांनी रचलेली ‘एकला चलो रे’ व ‘चित्त जेथा भयशून्य’ ह्या दोन कविता भारतीय स्वातंत्र्य संग्रामात प्रेरणा गीते म्हणून वापरण्यात आल्या. महात्मा गांधींशी मतभेद असतानाही स्वतंत्र मतदारसंघाविषयी असलेला गांधी-आंबेडकर वाद मिटवण्यात त्यांनी पुढाकार घेतला.
प्रभाव व वारसा
रवींद्रनाथांचा प्रभाव दाखवणारे अनेक समारंभ जगभरात होत असतात. बंगालमध्ये त्यांच्या जोराशंका ठाकुर बाडी येथे पुण्यतिथीस मोठा उत्सव होतो. अमेरिकेतील इलिनॉय येथे त्यांच्या स्मृतीपीत्यर्थ वार्षिकोत्सव होतो. रवींद्रनाथांमुळे प्रभावित व्यक्तीमत्वांत अमर्त्य सेन, ऍन्द्रे गिडेल (फ्रान्स), यसुनारी कावाबाता (जपान) आदी नोबेल विजेते, याशिवाय सलमान रश्दी , पाब्ले नेरुदा यांचा समावेश आहे. रवींद्रनाथांचे साहित्य जगभरातील अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे , विख्यात भारतीय चित्रकार नंदलाल बोस यांच्या जडणघडणीवर रवींद्रनाथांचा प्रभाव आहे. जीवनाच्या शेवटच्या दशकात रवींद्रनाथ पूर्णपणे जनसन्मूखी होते. त्यांची लोकप्रियता विशेषतः बंगालमध्ये शिखरावर होती. १५-जानेवारी-१९३४ रोजी बिहारमध्ये झालेल्या भूकंपाची, महात्मा गांधींनी “दलित अत्याचाराचा परमेश्वराने घेतला सूड” अशी संभावना केली. या वक्तव्याचा रवींद्रनाथांनी निषेध केला.बंगालच्या आर्थिक व सामाजिक अवनती बाबत व कोलकत्यातील भयावह दारिद्र्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या दारिद्यावर केलेल्या मुक्तछंदातील १०० ओळींच्या कवितेचा प्रभाव सत्यजित रे यांच्या अपुर संसार ( अपुचे जग) या चित्रपटावरही पडलेला दिसतो. पुनश्च (१९३२), शेष सप्तक (१९३५), पत्रपुत (१९३६) आदी गद्यपद्यांचा(prose-prose) समावेश असलेले स्वतःच्या लिखाणाचे १५ खंड संपादित केले. याशिवाय ‘चित्रगंदा’, श्यामा (१९३९), चंडालिका (१९३८) सारख्या नृत्य-नाटिकांवर विविध प्रयोग केले. याशिवाय दुई बोन (दोन बहिणी) (१९३३), मलंच (१९३४), and घर अध्याय (१९३४)आदी कादंब-या लिहिल्या. अखेरच्या काळात विज्ञानात रवींद्रनाथांनी विशेष रस घेतला. यातूनच त्यांच्या विश्वपरिचय या निंबंधसंग्रहाची निर्मिती झाली. जीवशास्त्र, भौतिकी व खगोलशास्त्राचा त्यांनी केलेला अभ्यासाचा प्रभाव त्यांच्या कवितेवरही जाणवतो. त्यांच्या कवितेतून झळकणारा निसर्गवाद(naturalism) हा त्यांना वैज्ञानिक नियमांप्रती त्यांना असलेला आदर अधिरेखित करतो. विज्ञानाची प्रगती त्यांनी आपल्या विविध रचनांमधून मांडली आहे जसे से (तो) (१९३७),तीन संगी (१९४०), गल्पस्वल्प (१९४१).
रवींद्रनाथांच्या आयुष्यातील शेवटची चार वर्षे प्रदीर्घ व्याधी व आजारपणांनी व्यापली. १९३७ साली शुद्ध हरपून ते बराच काळ कोमात होते. पुन्हा १९४० सालचा कोमा जीवघेणा ठरला. या शेवटच्या काळात लिहिलेल्या काव्यरचना रवींद्रनाथांच्या काव्यरचना सर्वश्रेष्ठ मानन्यात येतात.त्यांचे मृत्युविषयक चिंतन या रचनांतून प्रकटते. ७-ऑगस्ट-१९४१ रोजी रवींद्रनाथांचा कोलकात्याच्या त्यांच्या वडिलोपार्जित जोरशंका ठाकुर बाडी येथे मृत्यु झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here