जबलपूरमध्ये उपद्रवींचा धुमाकूळ; पोलिसांवर जळते फटाके फेकले

जबलपूर (मध्यप्रदेश) : शहरात मंगळवारी काही असामाजिक तत्त्वांनी धुमाकूळ घातल्याचं समोर येतंय. कथितरित्या पोलिसांवर दगडफेक करतानाच जळते फटाकेही फेकण्यात आले. यामुळे, आत्मरक्षेसाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. तसंच उपद्रवींना पांगवण्यासाठी पोलिासांना अश्रुधुराचीही मदत घ्यावी लागली.



अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जबलपूरमधल्या मच्छी बाजारात ही घटना घडली. मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्तानं मिलाद-उन-नबी साजरी करण्यासाठी इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या संख्येत लोक मशिदीत नमाज अदा करण्यासाठी गोळा होत होते. निर्धारीत मार्गानं जाण्यासाठी पोलीस त्यांना विनंती करत होते. संवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात पोलीसही सावध होते.



जबलपूरचे जिल्हा पोलीस अधिक्षक सिद्धार्थ बहुगुणा यांच्या म्हणण्यानुसार, मच्छी बाजार हा संवेदनशील भाग आहे. त्यामुळे इथे मोठ्या संख्येत पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मात्र, अचानक काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. तसंच जळते फटाकेही पोलिसांवर फेकण्यात आले. यानंतर पोलिसांनीही लाठीचार्ज करत अश्रुधुराचा वापर केला.

जिल्हाधिकारी कर्मवीर शर्मा यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांवर फटाके आणि दगड फेकणाऱ्या असामाजिक तत्त्वांची ओळख पटवण्यात यश आलंय. अशा उपद्रवींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here