ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : किरकोळ कारणावरुन भिवंडीतील गैबीनगरमध्ये शुक्रवारी सकाळी एका व्यक्तीने दुसऱ्या एका व्यक्तीवर चाकूने वार केले. यावेळी त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या या व्यक्तीच्या कुटुंबासह अन्य एका व्यक्तीवरही आरोपीने चाकूने हल्ला केल्याने यामध्ये दोघांचा मृत्यू तर चौघे जखमी झाल्याचा खळबळजनक प्रकार घडला. जखमीमध्ये आई आणि तीन मुलांचा समावेश असून शांतीनगर पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. मोहमद अन्सारूलहक मोहमद लुकमान अन्सारी (वय ४५ वर्ष) असे या आरोपीचे नाव आहे.
गैबीनगरमधील खान चाळीत अन्सारी कुटुंब राहत असून हसीना अन्सारी याच चाळीत राहणारा अन्सारूलहक याला पूर्वी ‘भावांचे फुकट खाऊन लोकांना त्रास देतो’ असे बोलल्या होत्या. याच गोष्टीच्या रागातून शुक्रवारी सकाळी अन्सारूलहक याने स्व:ताच्या घरासमोर उभ्या असलेल्या हसीना यांचे पती कमरूजमा मोहमद इस्लाम अन्सारी यांच्यावर चाकूने वार केले. कमरूजमा यांना वाचवण्यासाठी त्यांची पत्नी आणि तीन मुले धावून गेली. अन्सारूलहक याने त्यांच्यावरही चाकूने हल्ला केला.
यावेळी याच भागातील इम्तियाज मोहमद जुबेर खान (३५) हा त्यांच्या मदतीसाठी पुढे आला होता. आरोपीने त्याच्यावर चाकूने वार केले. आरोपीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले कमरुजमा यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी आणि तीन मुले जखमी झाली आहेत. मुलांमध्ये दोन मुली आणि एक मुलगा आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.






