पाच वर्षांनंतर तुरुंगातून सुटल्यानंतर घाटकोपरमध्ये केली महिलेची हत्या

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : घाटकोपर येथील महिलेच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. महिनाभरापूर्वीच तुरुंगातून सुटून बाहेर आलेल्या ४१ वर्षीय आरोपीला शनिवारी पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. घाटकोपरमध्ये एका महिलेची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. नवी मुंबईतील एका महिलेची हत्या केल्याप्रकरणी तो पाच वर्षे तुरुंगात होता. महिनाभरापूर्वी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने आणखी एका महिलेची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबर रोजी घाटकोपरमधील पंतनगरमध्ये एका ५२ वर्षीय महिलेची हत्या झाली होती. या महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. महिलेचे हात, पाय बांधले होते आणि तोंडावर पट्टी बांधली होती. पोलिसांनी तपास करून या हत्येचा छडा लावला आहे. या प्रकरणी ४१ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर प्रतिकार केल्याने त्याने महिलेची हत्या केली असावी, अशी शक्यता प्राथमिक तपासात व्यक्त केली जात आहे. या आरोपीने यापूर्वी नवी मुंबईतील वाशी परिसरातही एका महिलेची हत्या केली होती. २०१६ मध्ये त्याने हे कृत्य केले होते. या प्रकरणात आरोपी तुरुंगात कैद होता. याचवर्षी ऑक्टोबरमध्ये तो तुरुंगातून बाहेर आला आहे.

घाटकोपरच्या पंतनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने मुंबईतील मानखुर्द परिसरातून आरोपीला अटक केली. २ नोव्हेंबरला घाटकोपरच्या पंतनगर परिसरात भाजी मार्केटमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला होता. महिलेचे हातपाय बांधलेले होते, तिच्या तोंडावर पट्टी बांधलेली होती. महिलेसोबत अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. महिलेच्या डोक्यावर दगड घालून तिची हत्या केल्याचे जखमांवरून स्पष्ट झाले होते. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला होता. पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपीचा चेहरा अस्पष्ट दिसत होता. पोलिसांनी तपास सुरू कला असता, आरोपी मुंबईतील विविध परिसरांत फुटपाथवर फिरत असतो आणि तो बेघर असल्याची माहिती मिळाली. तपास केला असता, वाशीत एका महिलेच्या हत्या प्रकरणातही तो सहभागी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी अखेर आरोपीला मानखुर्द रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here