आंबी-देवळाली प्रवरा रस्त्यावर रिक्षा पलटी होऊन पाच गंभीर जखमी

अहमदनगर (प्रतिनिधी) : राहुरी तालुक्यातील आंबी-देवळाली प्रवरा रस्त्यावरील सरई परिसरात खड्यात रिक्षा पलटी होऊन पाच जण जखमी झाल्याची झाल्याची घटना घडली आहे.

या अपघातात रिक्षाचालक प्रशांत किसन भिंगारदिवे, ताराबाई फकिरा पवार, मच्छिंद्र दादा मगर व इतर दोन असे पाच जण गंभीर जखमी होऊन खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.हे सर्व प्रवासी आंबी-अंमळनेर येथे आपल्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी येत होते. अवघ्या सहा ते सात महिन्यांपूर्वी आंबी-देवळाली प्रवरा रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे.

मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले दिसून येते. काम पूर्ण होताच अवघ्या काही दिवसांतच या रस्त्यावर खड्डे पडायला सुरुवात झाली होती. तसेच रस्ताही ठिकठिकाणी खचला आहे. नियमाप्रमाणे एक वर्षापर्यंत रस्त्याची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असते. या खड्यांमुळे या भागात अनेक छोटे अपघात नित्याचे झाले आहेत. शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण यांना याच खड्यांमधून वाट काढत प्रवास करावा लागतो.

मध्यंतरी ठेकेदाराने लगबगीने खड्डे दुरुस्ती करण्याची तत्परता दाखवली. मात्र पुन्हा खड्ड्यांची परिस्थिती जैसे थे झाली. या निकृष्ट कामाची चौकशी करून संबधित ठेकेदारावर व त्याला पाठीशी घळणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here