ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : कळव्यातील खारेगाव येथे दारूच्या पैशांच्या वादातून एक तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. या हत्येची माहिती मिळताच कळवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने दोन पथके तयार केली. अवघ्या १२ तासांच्या आत या हत्येचा उलगडा केला. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कळवा खारेगाव येथे काल एक अज्ञात तरुण मृतावस्थेत आढळल्याची माहिती कळवा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृताच्या शरीरावर मारहाण केल्याचा जखमा आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंद करत तपासाला सुरुवात केली. मृत तरूण कोण आहे, आरोपी कोण? याची माहिती मिळवण्यासाठी कळवा पोलिसांनी दोन पथके तयार केली. तपासादरम्यान पोलिसांना मृत तरूण हा कळव्याच्या इंदिरानगर परिसरात राहणारा असून, त्याचे नाव गुलाब सलामत शेख असे असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली.
घटनेनंतर १२ तासांच्या आत पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्या तीनही आरोपींनी गुन्हा कबूल केला. आकाश पळस, सनी सोनकर आणि फैजल खान अशी या तीन आरोपींची नावे असून हे तीनही आरोपी कळव्याच्या इंदिरानगर परिसरातील राहणारे आहेत. आरोपी आणि तरूणामध्ये दारू पिण्यासाठी पैशांवरून बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी गुलाबला लोखंडी पाईपने मारहाण केली होती आणि त्यात त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.






