अमृतसर (पंजाब) : येथील सुवर्ण मंदिरात जमावाच्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या तरुणाने रेलिंगवरून उडी मारून गुरु ग्रंथ साहिब येथील पावित्र्य भंग करणारी कृती केल्यानंतर सुवर्ण मंदिरातील उपस्थितांचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात जमावाने या तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असून या घटनेने खळबळ उडाली आहे. अमृतसरचे पोलीस उपायुक्त परमिंदरसिंग भंडाल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्ण मंदिरात सायंकाळी ‘ रेहरास साहिब ‘ पाठ सुरू असतानाच हा प्रकार घडला. एक अज्ञात व्यक्ती अचानक रेलिंगवरून उडी मारून गाभाऱ्यात आला व त्याने गुरु ग्रंथ साहिब यांच्यासमोर ठेवण्यात आलेली तलवार उचलण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी या व्यक्तीला तिथे उपस्थित शीरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी सदस्यांनी पकडले व बाहेर नेले. तिथे जमावाने त्याला बेदम मारहाण केली असता त्यात या व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. तो एकटाच सुवर्णमंदिरात आला होता, असे प्रथमदर्शनी दिसत असून तरुणाची ओळख पटवणारे कोणतेही पुरावे अद्याप सापडलेले नाही. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
शीरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे कार्यकारी सदस्य भाई गुरप्रीतसिंह रंधावा यांनी, श्री अमृतसर साहिब येथे घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. या घटनेची तत्काळ चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी पंजाब सरकारकडे केली आहे. भाजप नेते मनजिंदरसिंग सिरसा यांनीही या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. दरबार साहिब येथील पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ही दु:खद घटना आहे. याबाबत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याशी माझी चर्चा झाली असून याप्रकरणी योग्य ती कारवाई होईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे सिरसा यांनी सांगितले. गृहमंत्री याबाबत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.






