शेजारती व काकड आरतीला साईभक्तांना मिळणार नाही प्रवेश – कार्यकारी अधिकारी
अहमदनगर (प्रतिनिधी संजय महाजन) : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्या दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजीच्या कोवीड- १९ संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार दिनांक २५ डिसेंबर २०२१ रोजीपासून रात्रौ ०९.०० ते सकाळी ०६.०० यावेळेत जमावबंदी लागू केल्यामुळे रात्रौ ०९.०० वाजेनंतर श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
श्रीमती बानायत म्हणाल्या, देश व राज्यात आलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्या वतीने दिनांक ०५ एप्रिल २०२१ पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले होते. परंतु राज्य शासनाने दिनांक ०७ ऑक्टोंबर २०२१ पासून काही अटी-शर्तीवर धार्मिकस्थळे खुले करण्याचे आदेश दिलेले होते. परंतु सध्या पुन्हा राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. यामध्ये दिनांक २५ डिसेंबर २०२१ रोजी पासुन रात्रौ ०९.०० ते सकाळी ०६.०० यावेळेत जमावबंदी लागु केलेली आहे. त्याअनुषंगाने संस्थानच्या वतीने सकाळी ०६.०० ते रात्रौ ०९.०० यावेळेत भाविकांना श्रींच्या दर्शनासाठी समाधी मंदिर खुले राहणार आहे. तसेच रात्रौ १०.३० वाजताची श्रींची शेजारती व पहाटेची ०४.३० वाजताची काकड आरती नियमित होणार असून याकरीता भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही.
राज्यात जमावबंदी लागू असल्यामुळे संस्थानचे श्री साईप्रसादालय, लाडू विक्री काऊंटर, कॅन्टीन आदी सुविधा रात्रौ ०९.०० वाजेनंतर बंद राहणार आहेत, याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी. तरी साईभक्तांनी कोव्हीड १९ चे संदर्भातील सर्व मार्गदर्शक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच सर्व साईभक्तांनी व ग्रामस्थांनी याबाबत संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती बानायत यांनी केले.






