जळगाव (संपादक सुनिल पाटील) : तालुक्यातील गाडोदा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचे बॅनर फाडल्याप्रकरणी सोशल मिडीयावर सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपामध्ये जळगाव ग्रामीणचे युवासेना विधानसभा क्षेत्र प्रमुख आबा माळी व्यक्त झाले.
यावेळी बोलतांना आबा माळी म्हणाले, धरणगाव तालुक्यातील एका गावात विरोधी पक्षाच्या प्रचाराचे बॅनर फाडले गेल्याची घटना अत्यंत दुःखद आणि निंदनीय आहे. विरोधकांनी याचा आरोप आमच्यावर करणे म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू घसरली असून असुरक्षिततेची पावतीच आहे. आम्हाला जनतेच्या प्रेम, आदर, आणि विश्वासावरच विजय मिळवायचा आहे; कधीही द्वेष किंवा तोडफोडीच्या माध्यमातून नव्हे. आमची संस्कृती ही सेवा, विश्वास आणि जनतेशी बांधिलकीची आहे. ज्या राजकारणात फक्त स्वच्छ प्रचार आणि लोकांच्या हृदयात स्थान मिळवणे हेच आमचे ध्येय आहे, त्यात असा प्रकार केला जाणे ही आमची मुळातली वृत्ती व संस्कृती नाही.
गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही एकजुटीने, शिस्तबद्धपणे काम करतो आणि विरोधकांशीही आदराने वागण्याचे आमचे संस्कार आहेत. आम्हाला विकासाच्या मुद्द्यांवर जनतेचे समर्थन मिळते, कारण आम्ही नेहमी सकारात्मक प्रचार करतो. त्यामुळे विरोधकांनी आरोप करण्याऐवजी आत्मचिंतन करावे असे वाटते, असेही ते म्हणाले.







