जळगाव (संपादक सुनिल पाटील) : गाडीला आग लागल्याच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. त्याचवेळी दुसऱ्या ट्रॅकवर समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने उड्या मारलेल्या अनेक प्रवाशांना उडवलं असून या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्टेशनजवळ आज (दि.२२) बुधवारी दुपारी मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे गाडीच्या चाकांमधून आगीच्या ठिगण्या उडाल्या. मात्र यामुळे गाडीतील प्रवाशांमध्ये एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली. भयभीत झालेल्या प्रवाशांनी चालत्या गाडीतून बाहेर उड्या मारल्या. पण त्याचवेळी दुसऱ्या ट्रॅकवर नवी दिल्ली येथून बंगळुरूकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना चिरडल्याची माहिती समजत आहे.
प्राथमिक अंदाजानुसार या घटनेत ८ ते १० जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच जळगावच्या खासदार स्मिता ताई वाघ या घटनास्थळाकडे रवाना झाल्याचे समजते आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच..)







