कोपरगाव तालुका उजाड करणाऱ्यांना विकासकामांनी उत्तर देणार – खा.भाऊसाहेब वाकचौरे; १५.५० कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन

खा.भाऊसाहेब वाकचौरे

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : पंतप्रधान ग्रामसडक योजनेतर्गत कोपरगाव तालुक्यातील दोन महत्वाच्या रस्त्यांसाठी एकूण १५.५० कोटी रुपये निधी अंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन महाआघाडीचे खासदार, लोकनेते भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगावचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे तर प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप वर्पे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे मुकुंद सिनगर उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मी कुणावर टीका करणार नाही मात्र कोपरगाव तालुका उजाड करणाऱ्यांना विकासकामांनी उत्तर देणार असल्याचे स्पष्ट केले.

खा.वाकचौरे यांच्या विशेष प्रयत्नातून मौजे येसगाव ते टाकळी, सोनारी, रवंदे ते जिल्हा हद्द आणि मौजे पोहेगाव ते देर्डे कोऱ्हाळे अशा महत्वाच्या गावांना जोडणाऱ्या मजबूत रस्त्यांमुळे स्थानिक नागरिकांचा दळणवळणाचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार आहे. अनेक रस्ते आजही प्रलंबित असून कोपरगाव तालुक्यातील जनतेचा विकासाचा अनुशेष भरून काढणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी अधिक सांगितले कि, शहरात सुरु असलेल्या अतिक्रमण मोहिमेबाबत आम्हाला कुठलीही कल्पना नसून आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी यांना विश्वासात न घेता छोट्या व्यावसायिकांना रस्त्यावर आणणाऱ्या प्रशासकीय यंत्रनेचा जाहीर निषेध व्यक्त केला. यानंतर तात्काळ दूरध्वनीवरून जिल्हाधिकारी, प्रांत आणि सीओ यांना अतिक्रमण काढण्याबद्दल दुमत नाही मात्र सर्वांना विश्वासात घेऊन काढले असते तर आर्थिक नुकसान टाळता आले असते त्यामुळे होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देत जाब विचारला. कुठल्याही परिस्थितीत पुनर्वसन करण्याबाबत ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना केल्यात.

सर्वप्रथम येसगाव, टाकळी आणि पोहेगाव येथे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून आत्तापर्यंत मतदार संघातील विविध तालुक्यात चार महिन्यात 50 कोटींच्या पुढे निधी आणला असल्याची जाहीर माहिती देत सामान्य जनता हीच माझी ताकद असल्याची भावना व्यक्त केली. त्यामुळे दूरदृष्टी ठेवून सामाजिक विकास करताना खा.वाकचौरे जनभावनांचा आदर करतात आणि विकासाच्या कामात कुठलेही राजकारण न करता अत्यंत नम्रपणे लोकार्पण करतात,हि बाब पंचक्रोशीतील ग्रामस्थांना भावली आहे. म्हणून समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी राजेंद्र झावरे, संदीप वर्पे व मुकुंद सिनगर यांनी कोपरगाव तालुक्यातील सामान्य जनतेच्या वतीने खा.वाकचौरे यांचे आभार व्यक्त केले आणि यापुढेही विकास कामे करताना कोपरगाव तालुक्याला अधिक झुकतं माप देण्याची विनंती केली.

यावेळी महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारींसह साहेबराव कंक्राळे, मच्छिन्द्र देवकर, खंडू मोरे, इरफान शेख, ऋषिकेश औताडे, जे. डी. दिघे, कैलास डुबे, अशोक पवार, तान्हाजी लामखडे, शंकर सिनगर, किशोर सोनवणे आदिसह पंचक्रोशीतील सुज्ञ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here