मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : गोरेगाव येथील फिल्मसिटीतील लोकप्रिय हिंदी मालिका अनुपमाच्या सेटवर भीषण आग लागली आहे. आज (दि.२३) पहाटे ५:०० वाजता भीषण आग लागली. सकाळी ७:०० वाजता शूटिंग सुरू होण्याच्या नियोजित वेळेच्या फक्त दोन तास आधी, आगीने सेट पूर्णपणे जळून खाक झाला आहे. आग लागली तेव्हा दिवसाच्या शुटिंगची तयारी सुरू होती.
घटनेच्या वेळी, अनेक कामगार आणि क्रू मेंबर्स सेटवर उपस्थित होते. सुदैवाने, अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण जर का शूटिंग नियोजित वेळेनुसार सुरू झाले असते तर परिस्थिती भयानक बनू शकली असती, ज्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता होती. अनुपमा सेट जळून खाक झाला असला तरी, शेजारचे अनेक सेट आगीतून थोडक्यात बचावले. जर वेळीच आग आटोक्यात आणली नसती तर यामुळे आणखी मोठी आपत्ती ओढवू शकली असती.
याप्रकरणी ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश गुप्ता यांनी या घटनेची तपासणी करण्याबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेले असून फिल्म सिटीच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ही आग शॉटसर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत आरे पोलीस अधिक तपास करत आहेत.







