जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टस शरद चव्हाण) | स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काहुरखेडे येथे विविध देशभक्तीपर आणि सामाजिक जनजागृतीपर उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वक्तृत्व स्पर्धा, देशभक्तीपर नृत्य, लेझीम व डंबेल्स कवायत संचलनाने कार्यक्रमात विशेष रंगत आणली.
शाळेतील एकूण ६५ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ३८ विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला. यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या ६ विद्यार्थ्यांनी इंग्रजीत, २ विद्यार्थ्यांनी हिंदीत तर ३० विद्यार्थ्यांनी मराठी भाषेत देशभक्तीपर भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने केलेल्या भाषणांमधून राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्याचे महत्त्व आणि देशाप्रती असलेली कर्तव्यभावना व्यक्त केली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आधारित लेझीम व डंबेल्स कवायत संचलन सादर केले. शिस्तबद्ध पद्धतीने केलेल्या या संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. तसेच विद्यार्थ्यांनी दोन देशभक्तीपर गीतांवर सामूहिक नृत्य सादर केले. सहा विद्यार्थिनींनी वैयक्तिकरित्या देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
भारतीय सैन्यदलात सेवेत असलेले योगेश प्रल्हाद पाटील यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी शाळेतील सर्व ६५ विद्यार्थ्यांना लेखनासाठी पॅड व बिस्किटांचे वाटप केले. त्यांनी विद्यार्थ्यांना देशसेवा, शिस्त, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रप्रेमाचे महत्त्व सांगत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी तंबाखूमुक्त अभियानाची शपथ घेतली. तंबाखू व व्यसनांपासून दूर राहून निरोगी समाज निर्माण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तसेच “सर्व असाक्षर व्यक्तींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी १०० टक्के योगदान देऊन महाराष्ट्र साक्षर महाराष्ट्र बनवू” या संकल्पनेतून उपस्थितांनी साक्षरता अभियानाची शपथ घेतली. समाजातील प्रत्येक व्यक्ती साक्षर होण्यासाठी योगदान देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. शपथविधीनंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सांगितले की, “स्वातंत्र्य आपल्याला अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळाले आहे. आजच्या पिढीने शिक्षण, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे. देशप्रेम केवळ घोषणा देण्यात नसून आपल्या दैनंदिन कृतीतून ते दिसले पाहिजे.”
विद्यार्थ्यांनी “शिका, पुढे चला आणि देशाच्या विकासात योगदान द्या” हा प्रेरणादायी संदेश मनात ठेवून चांगले नागरिक बनण्याचा संकल्प केला.शाळेतील ६५ विद्यार्थ्यांपैकी ३८ विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल उपस्थित ग्रामस्थ, पालक, महिला, सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला सुरवाडे, उपशिक्षक समाधान जाधव, शिक्षिका ममता तडवी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, महिला तसेच शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.वक्तृत्व, देशभक्तीपर नृत्य, लेझीम, डंबेल्स कवायत, सामाजिक शपथ आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे काहुरखेडे जिल्हा परिषद शाळेचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.







