नवी दिल्ली – कोरोनामुळे देशात तब्बल अडीच महिन्यांचा कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. त्यानंतर, केंद्र आणि राज्य सरकारने अनलॉक करत परिस्थिती पूर्वपदावर आणण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अनलॉक 1 मध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. सध्या देशातील एकूण रुग्णांची संख्या साधारणपणे 4.5 लाखांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा देशातील अनेक राज्यांवर लॉकडाउनचे सावट घोंगावत असून काही राज्यांनी लॉकडॉउन लागू केले आहे.
तामिळनाडूतील चेन्नई येथे 19 ते 30 जूनपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे गुवाहटी येथेही मंगळवार 23 जूनपासून 14 दिवसांसाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. दरम्यान, देशातील एकूण रुग्णसंख्या आत्तापर्यंत 4,40,215 वर पोहोचली असून त्यामध्ये 1,78,014 एक्टीव्ह रुग्ण आहेत. तर जवळपास अडीच लाख रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दरम्यान, कोरोनामुळे देशात 14,011 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.







