मुंबई – पतंजलीचे बाबा रामदेव यांनी कोरोनावर 100 टक्के मात करणारे कोरोनिल औषध लाँच केले होते. यावरून वाद निर्माण झाल्याने आयुष मंत्रालयाने या दिव्य कोरोना किटच्या जाहिरातीवर बंदी आणली होती. तर राजस्थान सरकारने यापुढचे पाऊल उचलताना गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, महाराष्ट्र सरकारचे मंत्री अजित पवार यांनी ज्यांचा विश्वास असेल त्यांनी मागवावे अशी भुमिका जाहीर केली होती.
महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत सरकारची भूमिका मांडली आहे. मध्यरात्रीनंतर ट्विट करून महाराष्ट्र सरकारचा निर्णय जाहीर केला आहे. कोरोनिलच्या क्लिनिकल ट्रायलबाबत काही माहिती उपलब्ध नाहीय. जयपूरची एनआयएमएस संस्था याचा तपास करत आहे. यामुळे अशा धोकादायक औषधाला महाराष्ट्र सरकार कधीही परवानगी देणार नाही. यामुळे महाराष्ट्रात या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात येत आहे, असे देशमुख यांनी म्हटले आहे.
राजस्थान सरकारनंतर कोरोनिल औषधावर बंदी आणणारे महाराष्ट्र दुसरे राज्य आहे. आयुष मंत्रालयाचीच जर परवानगी नसेल तर कोणत्याही आयुर्वेदिक औषधाच्या विक्रीला राज्यात बंदी असल्याचे राजस्थानने जाहीर केले होते.







