आदिवासी क्रांतिवीर खाज्या नाईक यांना डाकू संबोधल्यामुळे आदिवासी संघटनांचा उद्रेक

नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझा द्वारा सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या ‘ग्रामदैवत’ या कार्यक्रमात क्रांतीवीर खाज्या नाईक यांचा उल्लेख करतांना ‘ डाकू’ असे म्हटले आहे त्यामुळे आदिवासींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत म्हणून शहादा तालुक्यातील सर्व आदिवासी संघटनेच्यावतीने पोलीस निरीक्षक यांना निवेदन देवून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
विर बहादुर खाज्या नाईक हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील आद्यक्रांतिवीर आहे तसेच इंग्रजांच्या नोकरीला लाथ मारून सातपुडा परिसरातील आदिवासी समाजाला एकत्र केले आणि आपले तीन हजाराचे सैन्यदल तयार करून इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. या आदिवासी सैन्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. अशा जळजळीत रक्त संग्रामाचा इतिहास नजर अंदाज करून एबीपी माझा या एका जबाबदार वृत्तवाहिनीने क्रांतिवीर खाज्या नाईक यांना डाकू म्हणणे म्हणजे भारतीय इतिहासावर काळीमा लावणे असे आहे. आदिवासी इतिहास अस्मिता आत्मसन्मान दाबण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.तरी या बेजबाबदार वृत्तवाहिनीचे संपादक आणि स्थानिक वार्ताहर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा तालुक्यातील सर्व आदिवासी संघटनांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी आदिवासी संघटनेच्यावतीने श्री अशोक मुकुरंदे, सुनील सुळे ,नामदेव पटले , संतोष पावरा व इतर आदिवासी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here