मुंबई (हितेश मिस्त्री) – दोन टेबलांमध्ये एक मीटरचे अंतर, शारीरिक अंतराचे नियम पाळण्याबरोबरच ताप-सर्दी-खोकल्यासारखी लक्षणे नसलेल्यांनाच प्रवेश, बुफे पद्धतीला बंदी, आत सोडताना प्रत्येकाची तपासणी, फक्त ५० टक्के आसनक्षमतेचा वापर करणे आदी बंधने असलेली मार्गदर्शक नियमावली उपाहारगृहे आणि परमिटरुमसाठी राज्य शासनाने शनिवारी लागू केली आहे. तसेच सर्व कर्मचाऱ्यांची नियमित कोरोना चाचणी करण्याची अटही मालकांवर घालण्यात आली आहे.
मार्चपासून ग्राहकांसाठी बंद असलेली उपाहारगृहे- परमिटरुम ५० टक्के आसनक्षमतेच्या मर्यादेसह सोमवारपासून सुरू होत असून त्यासाठीची मार्गदर्शक नियमावली राज्य सरकारने शनिवारी जाहीर केली.
सर्व उपाहारगृहे, परमिटरुममध्ये अंतर्गत रचनेत बदल करून दोन टेबलांमध्ये किमान एक मीटरचे अंतर राहील अशी व्यवस्था करावी, दिवसातून किमान दोन वेळा संपूर्ण परिसर निर्जंतुक करावा, कर्मचाऱ्यांना एन-९५ किंवा तत्सम मुखपट्टी देण्यात यावी, सीसीटीव्हीचे चित्रण जपून ठेवण्याची अटही घालण्यात आली आहे. परमिटरुममधील मद्याच्या सर्व बाटल्या व इतर साधनांची स्वच्छता चोख ठेवावी, ग्लासचे निर्जंतुकीकरण करावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
कोरोनाची लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश द्यावा व त्यासाठी प्रत्येक ग्राहकाची थर्मल गनने तपासणी करावी. शरीराचे तापमान १०० डिग्री फॅरेनहाइटपेक्षा अधिक आढळल्यास त्यांना प्रवेश देऊ नये आणि सर्व ग्राहकांचे नाव, संपर्क क्रमांक आदी तपशील नोंदवून ठेवावे. तसेच हे तपशील स्थानिक प्रशासनाला देण्याबाबतची त्यांची संमती घ्यावी. सुरक्षित अंतराच्या नियमांचे कसोशीने पालन करावे, ग्राहकांना सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे, रोख रकमेचे व्यवहार करताना खबरदारी घ्यावी आणि शक्यतो ऑनलाइन व्यवहारांना प्राधान्य द्यावे, स्वच्छतागृहांचे सॅनिटायझेशन ठरावीक अंतराने करावे, कॅशिअर आणि ग्राहकांचा थेट संपर्क येणार नाही या दृष्टीने प्लास्टिकचा पारदर्शक पडदा लावावा, हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी, असे या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व कर्मचाऱ्यांना वापरून फेकता येतील असे हातमोजे व इतर साधने देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहे.
राहण्याची व्यवस्था असलेल्या हॉटेल-रिसॉर्टसारख्या ठिकाणी वरील सर्व नियमांबरोबरच इतरही काही नियम घालण्यात आले आहेत. अतिथींची एकाच वेळी उपाहारगृहात गर्दी होऊ नये यासाठी त्यांना वेळेची आगाऊ नोंदणी करण्यास सांगावे, कक्षांचे दरवाजे उघडण्यासाठी कर्मचारी नेमावेत अशा अनेक अटी घालण्यात आल्या आहेत.







