मुंबई (हितेश मिस्त्री) – कोरोनाची बाधा फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच होते, हा सुरुवातीच्या काळातील समज या आजाराच्या विषाणूने खोटा ठरवला आहे. या आजाराची लागण सर्वच वयोगटात होत असल्याचे या संदर्भातील बाधितांच्या संख्येवरून लक्षात येते. या विषाणूचा सर्वाधिक फटका हा तरुणांना म्हणजे ३१ ते ४० या वयोगटाला बसल्याचे राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
राज्य शासनाकडून दैनंदिन कोविड-१९ अहवाल जाहीर केला जातो. ५ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी १० वा. जारी केलेल्या अहवालानुसार, राज्यात एकू्ण कोरोना रुग्णांची संख्या १४ लाख ४३ हजार होती ४०९ होती. यापैकी १४ लाख ३१ हजार ८७८ रुग्णांची वयोगटानुसार आकडेवारी अहवालात देण्यात आली. त्यानुसार ० ते १० वर्षे या वयोगटापासून तर ९१ ते १०० वर्षे या वयोगटापर्यंत सर्वानाच कमी-अधिक प्रमाणात कोरोनाची बाधा झाली आहे. सर्वात कमी बाधा ९१ ते १०० (२५४४ रुग्ण) या वयोगाटतील ज्येष्ठ नागरिकांना झाली असून सर्वाधिक बाधित हे ३१ ते ४० वर्षे (३,०५४५ रुग्ण) या वयोगटातील आहेत.
विशेष म्हणजे, मिशन बिगेन अगेन सुरू झाल्यानंतर घराबाहेर पडणाऱ्यांमध्ये युवकांचीच संख्या अधिक आहे हे येथे उल्लेखनीय. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती अधिक असल्याने त्यांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात या वयोगटात बाधित रुग्णांचे प्रमाण ३.७० टक्के (रुग्णसंख्या (५२,९७०))आहे. ११ ते २० वर्षे वयोगटात हे प्रमाण ६.८८ टक्के (रुग्णसंख्या ९८,५८७)आहे. करोनाचा सर्वाधिक फटका हा युवावर्गाला बसला आहे. २० ते ३० वर्षे या वयोगटात १६.९७ टक्के (रुग्णसंख्या २,४३,०३३).
३१ ते ४० वर्षे वयोगटात हे प्रमाण सर्वाधिक म्हणजे २१.३३ टक्के (रुग्णसंख्या ३,०५४,५२) आहे. ४१ ते ५० वर्षे या वयोगटात बाधितांचे प्रमाण १७.९० टक्के (२,५६,३७५) आहे. ज्येष्ठ नागरिकांना बाधा होण्याचे प्रमाण अधिक राहू शकते, अशी शक्यता सुरुवातीला व्यक्त केली जात होती. मात्र प्रत्यक्षात ६१ ते ७० वर्षे या वयोगटात बाधितांचे प्रमाण १०.६५ (१,५२,४६५) टक्के आहे. ७१ ते ८० वर्षे या वयोगटात ५.०३ टक्के ( रुग्णसंख्या ७१,९९२) तर ८१ ते ९० वर्षे या गटात १.४८ टक्के (रुग्णसंख्या २०,१६४) आहे. ९० ते १०० वर्षे या वयोगटात बाधितांचे प्रमाण ०.१८ टक्के आहे.







