पत्रकारांना धमकी म्हणजे लोकशाहीला आव्हान; दोषींना कोणतीही माफी नाही” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

मुंबई (संपादक सुनिल पाटील) | राज्यातील पत्रकारांना धमकावणे, मारहाण करणे अथवा त्यांच्या कामात अडथळा निर्माण करणे यासारख्या घटनांकडे राज्य सरकार अत्यंत गांभीर्याने पाहत आहे. अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींना आता थेट तुरुंगाची हवा खावी लागेल, असा कडक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत पत्रकार आणि माध्यम हे चौथे स्तंभ असून समाजातील विविध प्रश्न, जनतेच्या समस्या आणि शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते करतात. त्यामुळे पत्रकारांवर होणारे हल्ले, धमक्या किंवा दबाव टाकण्याचे प्रकार हे केवळ व्यक्तीवरचे हल्ले नसून लोकशाही व्यवस्थेवरील थेट आघात आहेत.

 

पत्रकारांना धमकी देणे म्हणजे लोकशाहीला आव्हान देणे होय. अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या कोणालाही माफी दिली जाणार नाही. माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे ही सरकारची जबाबदारी असून पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासन कटिबद्ध आहे.”

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे, त्यांना आवश्यक संरक्षण मिळावे आणि अशा घटनांतील दोषींवर तातडीने कठोर कारवाई व्हावी यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यात येतील, तसेच कोणत्याही राजकीय अथवा सामाजिक दबावाला बळी न पडता दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री यांच्या या भूमिकेचे पत्रकार संघटना आणि माध्यम प्रतिनिधींनी स्वागत केले असून पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांचे याबाबत ठोस निर्देश दिले आहेत. यात पत्रकारांना धमकावणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, प्रकरणांची द्रुतगतीने सुनावणी होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, पत्रकार संरक्षण कायद्याची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, पत्रकारांच्या सुरक्षेसाठी विशेष यंत्रणा उभारण्यात यावी.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here