लोकल आता सर्वांसाठी खुली होणार?

mumbai-local

मुंबई (हितेश मिस्त्री) – उपनगरीय मार्गांवर सध्या धावत असलेल्या विशेष लोकलमधून सर्वच महिलांना प्रवासाची परवानगी देण्याबाबत निर्माण झालेली कोंडी आज फुटली असतानाच आता सर्व प्रवाशांना लोकलमधून प्रवासाची मुभा देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

 

 


राज्य सरकारच्या विनंतीवरून सध्या फक्त अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठीच विशेष लोकल चालवण्यात येत आहेत. त्यात टप्प्याटप्प्याने कर्मचारी संख्या वाढवली गेली आहे. आधी खासगी व सहकारी बँकामधील कर्मचाऱ्यांना मर्यादित स्वरूपात लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली. त्यानंतर ‘ अनलॉक ‘च्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील डबेवाल्यांसाठी लोकलचे दरवाजे उघडण्यात आले आणि आता सर्व महिला प्रवाशांनाही लोकलमधून प्रवासाची परवानगी मिळाली आहे. राज्य सरकारने घटस्थापनेच्या मुहूर्तावर १७ ऑक्टोबरपासून ही परवानगी द्यावी, असे रेल्वेला कळवले होते.

 

 


दुपारी ११ ते ३ वाजेपर्यंत आणि नंतर ७ वाजल्यापासून पुढे शेवटच्या लोकलपर्यंत महिला लोकलने प्रवास करू शकतील, असेही त्यात नमूद करण्यात आले होते. मात्र रेल्वेने तातडीने ही परवानगी दिली नाही. हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला. त्यावरून बराच वाद पेटला. रेल्वेमंत्री पीयुष गोयल मुद्दामहून मुंबईची अडवणूक करत आहेत, असा आरोप करण्यात आला. या सगळ्या घटनाक्रमानंतर आज गोयल यांनीच ट्वीट करून महिलांना आनंदाची बातमी दिली आहे. त्यानुसार आजपासूनच महिलांसाठी लोकलची दारे उघडली जाणार आहेत. सरकारच्या पत्रात ज्या अटींचा उल्लेख आहे, त्यानुसारच महिलांना प्रवास करता येणार आहे. हा तीढा सुटल्यानंतर आता पुढचे पाऊल उचलण्याची तयारी सुरू झाली आहे.
राज्य सरकार पुढच्या टप्प्यात सर्वच प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्य सरकार आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आज (बुधवारी) एक महत्त्वाची बैठक होत आहे. मंत्रालयात ही बैठक होणार आहे. या बैठकीत खासगी क्षेत्रात काम करणारे नोकरदार आणि सर्वच प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याबाबत चर्चा होऊन ठोस निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

 


महिलांना ज्याप्रकारे लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली त्याच धर्तीवर अन्य प्रवाशांना परवानगी देता येईल का?, त्यात वेळेचे बंधन घालावे का? याविषयी बैठकीत चर्चा होणार आहे. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांची संख्या मोठी आहे. त्याअनुषंगाने लोकलसेवेवर किती ताण येऊ शकतो, याचाही विचार केला जाणार आहे. लोकलसेवा पूर्ण क्षमतेने पूर्ववत चालवण्याबाबतही साधकबाधक चर्चा यावेळी होऊ शकते, असे सांगण्यात आले. त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here