हिंगोली (प्रतिनिधी) – मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावर ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये वाद पेटलेला आहे. पण, कळमनुरीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनीच शासकीय नियमांचे उल्लंघन करत पालखी काढल्याची घटना घडली आहे. त्यामुळे संतोष बांगर यांच्यासह 50 जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालखी सोहळ्याला परवानगी नसताना पालखी काढल्या प्रकरणी प्रशासनाने ही कारवाई केली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर आणि अन्य पन्नास जणांविरोधात औंढा नागनाथ पोलिसांमध्ये 188 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, कोरोना काळात परवानगी नसताना पालखी काढण्यात आल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या दिवशी नागनाथ प्रभूंची बहीण, महाकाली की झेंडा घेऊन नागनाथ प्रभूच्या भेटीला येते. नंतर नागनाथ भाऊ आणि बहीण महाकाली हे मिळून, मामा रवळेश्वर यांच्या भेटीला, भजनी मंडळासह रवाना होतात.
परंतु, या पारंपरिक पालखी सोहळ्याला यावर्षी मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे परवानगी देण्यात आली नव्हती.
कोरोनाच्या काळात सार्वजनिक आणि धार्मिक कार्यक्रम घेण्यास मनाई करण्यात आली आहे. लोकांची गर्दी होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु, असं असतानाही आमदार संतोष बांगर यांनी नियमांना केराची टोपली दाखवली.
दरवर्षीप्रमाणे संतोष बांगर यांनी पालखी काढली. त्यामुळे त्यांच्या विरोधात प्रशासनाने ही कारवाई केली आहे. त्यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







