बीड (प्रतिनिधी) । होळी साजरी करायला निघालेल्या तरुणांच्या कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहे.
हा अपघात बीड शिरूर मार्गावरील रायमोह गावाजवळ घडला. या अपघात कृष्णा मुळे याचा मृत्यू झाला आहे. कृष्णा हा आपल्या मित्रांसोबत धूलिवंदनचा सण साजरा करण्यासाठी वॉटर पार्कला निघाला होता. मात्र, बीड-शिरुर मार्गावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलट्या खात थेट विहिरीच्या कठड्याला जाऊन धडकली. सुदैवाने ही गाडी विहिरीत पडली नाही. परंतु या भीषण अपघातात कृष्णा मुळे हा युवक जागीच ठार झाला. तर, कारमधील प्रसाद खोले, यश पेंढारे आणि अन्य एक जण जखमी आहेत.
अपघातातील कारच्या पाठीमागे त्यांच्याच मित्रांनी आणखी एक गाडी होती, त्यामुळे कारमधील मित्रांनी जखमींना तातडीने बीड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.







