आक्रमक आंबेगाव ग्रामस्थांनी केली ऑफिसची तोडफोड
पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – गेल्या काही वर्षांपासून पुणे शहराचा कचरा प्रश्न कठीण झाला आहे. दररोज शहरातून निघणाऱ्या शेकडो टन कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. आंबेगाव इथल्या कचरा प्रकल्पाविरुद्ध ग्रामस्थ आक्रमक झाले असून इथे कचरा टाकून देणार नाही असं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी रविवारी आंबेगाव बुद्रुक आंबेगाव खुर्द व जांभूळवाडी येथील नागरिकांच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. याचवेळी काही नागरिकांनी कचरा प्रकल्पालाचा आग लावल्यामुळे एकच गोंधळ उडाला. यावेळी कात्रज, सनसिटी आणि कोंढवा बुद्रुक अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
पुण्यात जमा होणारा काही कचरा हा आंबेगाव इथं टाकला जातो. त्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र या प्रकल्पामुळे गावाचं आरोग्यच धोक्यात आल्याचं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. हा प्रकल्प तातडीने हटवावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या आधीही आंबेगावमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवस कचरा टाकण्यात आला नव्हता. आता पुन्हा कचऱ्याचे ट्रक येत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. हे संतप्त गावकरी तिथे जमले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर तरुणांनी इथल्या कार्यालयात घुसून सामानाची तोडफोड केली. टीव्ही, एसी, खुर्च्यांसह इतर सामानाची तोडफोड करण्यात आली आहे.
अग्निशमन दलाच्या 8 फायरगाङ्या व टँकर घटनास्थळी असून आग विझवण्याचं काम सुरू केलं. घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलीस दाखल झाले असून आग कोणी लावली याचा शोध पोलीस घेत आहेत. शहरातला कचरा आणून आमच्या जीवाशी खेळ करू नका असा इशाराही ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.
या ठिकाणी कचऱ्याचे 30 ते 35 फूट कचऱ्याचे ढीग असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी जेसीबी, पोकलेन यांची मदत घेण्यात येत आहे. कचरा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.







