धुळे महानगरपालिका क्षेत्रात उद्यापासून चार वाजताच बंद होणार दुकाने : जिल्हादंडाधिकारी संजय यादव

दोंडाईचा (संतोष कोळी) – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. त्याबरोबरच मिशन बिगिन अगेन राबवीत जनजीवन पूर्व पदावर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, धुळे महानगरपालिका क्षेत्रात व्यापारी व नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिका क्षेत्रात सोमवार 6 जुलै 2020 पासून वैद्यकीय व अति तातडीच्या शासकीय सेवा वगळता अन्य सर्व आस्थापना व सेवा दुपारी चार वाजताच बंद होतील. वैद्यकीय व आपत्कालीन अत्यावयशक सेवा वगळून दुपारी 4 ते सकाळी 6 पूर्ण संचारबंदी राहील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांनी कळविले आहे.
जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे, धुळे शहर अपर तहसीलदार व प्रांत अधिकारी धुळे यांचे नियंत्रणाखालील महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने मिशन बिगिन आगेनसाठी निर्धारित केलेल्या नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची जास्त शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजपत्रित दर्जाचे झोनल अधिकारी नियुक्त करून मिशन बिगिन अगेनची शासन नियमाप्रमाणे प्रभावी अंमलबजावणी होते किंवा कसे याची वेळोवेळी पाहणी करून त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करून दर 3 तासाला अहवाल अपर तहसीलदार, धुळे व प्रांत अधिकारी, धुळे यांना सादर करणार, असा निर्णय महानगरपालिका प्रशासनाबरोबर झालेल्या चर्चेनंतर घेण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारपासून या निर्णयाची अमलबजावणी करण्यात येणार आहे.
संबंधित झोनल अधिकारी धुळे महानगरपालिका क्षेत्रात ठरवून दिलेल्या वेळी दुकाने चालू आहेत किंवा नाही, नागरिक मास्कचा वापर करीत आहेत की नाही, सॅनिटायझर वापर, वाहतूक नियंत्रण आदींचे व्हीडिओ चित्रीकरण करून प्रशासनास सादर करतील. त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच मिशन बिगिन आगेन फेज 2 धुळे मनपा क्षेत्रात आस्थापना (वैद्यकीय व अति तातडीच्या शासकीय सेवा वगळून) 4 वाजता बंद करण्याचे आदेश पारित केले आहेत. या बाबतीत सर्व नागरिक आस्थापना व सेवा पुरविणारे व्यापारी यांनी प्रशासनास सहकार्य करणे अभिप्रेत आहे. तथापि, या बाबतीत नागरिक, आस्थापना व सेवा पुरविणारे नागरिक यांनी प्रशासनास सहकार्य न केल्यास व कोरोना विषाणूच्या संसर्गात वाढ झाल्यास यापेक्षाही कठोरोत्तम कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत केली जाईल, असेही जिल्हादंडाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here