कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – करवीर तालुक्यातील वडणगे येथे एका मातेने आपल्या दोन मुलींसह पंचगंगा नदीत उडी मारून आत्महत्या केली. सुनेत्रा संतोष सावळकर (वय ३५), श्रीशा (१२) आणि सम्राज्ञी (७) अशी मृतांची नावे आहेत. रविवारी सायंकाळी नदीपात्रात त्यांचे मृतदेह आढळले. या प्रकरणाची करवीर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मूळच्या बार्शी येथील सुनेत्रा यांचा तेरा वर्षांपूर्वी वडणगे येथील संतोष सावळकर यांच्याशी विवाह झाला होता. पाच वर्षापूर्वी हृदयविकाराच्या धक्क्यांने त्यांचे पती संतोष यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या उदरनिर्वाहासाठी कोल्हापुरातील एका ज्वेलर्समध्ये सेल्समन म्हणून काम करत होत्या. शनिवारी सकाळी त्या वडणगे येथून दोन्ही मुलींसह कोल्हापुरात आल्या. रात्री उशिरापर्यंत त्या घरी न आल्याने कुटुंबीयांनी करवीर पोलिसांत त्या बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पंचगंगा नदीच्या घाटापासून जवळच असलेल्या पात्रात एक महिला आणि एका मुलीचा मृतदेह आढळला. माहिती मिळताच करवीर आणि लक्ष्मीपुरी पोलीस अग्निशमन दलाच्या जवानांसह घटनास्थळी पोहोचले. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांना आणखी एका मुलीचा मृतदेह मिळाला. तिन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
सुनेत्रा यांनी मोठी मुलगी श्रीशा हिच्यासोबत कमरेला घट्ट ओढणीने बांधून घेतलं होते, तर सात वर्षीय सम्राज्ञी हिचा मृतदेह वेगळा होता. पर्समधील आधार कार्डवरून मृतदेहांची ओळख पटवण्यात आली. पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी तिन्ही मृतदेह सीपीआरमध्ये पाठवले यानंतर कुटुंबीयांना माहिती देऊन बोलावून घेतले. सुनेत्रा यांनी दोन्ही मुलींसह आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत करवीर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.







