ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – रत्नागिरी एसटी डेपोतील चालकाने रविवारी दुपारी आत्महत्या केल्याचे उघड झाले असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी गेले तीन महिने पगार न मिळाल्याने तणावातून त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता एसटी कर्मचाऱ्यांसह संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पगार नसल्याने कटुंबाचा चरितार्थ कसा चालवायचा या विवंचनेतूनच या चालकाने आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला असावा, असे त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितले.
पांडुरंग संभाजीराव गडदे (वय ३५) असे आत्महत्या करणाऱ्या चालकाचे नाव आहे. ते मूळचे बीड जिल्ह्यातील परळी येथील असून रत्नागिरीतील माळनाका येथे रेंटवर राहत होते. रविवारी सकाळी नांदेड-रत्नागिरी असा प्रवास करून ते परतले होते. ड्युटी आटोपून ते आपल्या माळनाका येथील घरी गले होते. दरम्यान, दुपारनंतर त्यांचा सहकारी खोलीवर गेला असता दरवाजा ठोठावूनही आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर शेजाऱ्यांना याबाबत कल्पना देऊन लगेचच पोलिसांनाही कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दरवाजा उघडला असता पांडुरंग हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातून वैदयकीय अहवाल आल्यानंतरच पुढील तपासाची दिशा ठरेल, असे रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक अनील लाड यांनी पत्रकारांना सांगितले.
पांडुरंग गडदे यांचे बीड येथील कुटुंबीय आज रत्नागिरीत दाखल झाले असून गडदे यांचा मृतदेह त्यांच्या मूळ घरी परळी येथे नेण्यात येणार आहे, अशी माहिती एसटीचे अधिकारी अनंत जाधव यांनी दिली. मागील काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळत नसल्याने तसेच दिवाळी तोंडावर असूनही मागील तीन महिन्यांचा पगार मिळाला नसल्याने सर्वच कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आत्महत्या केलेल्या पांडुरंग गडदे यांनी सुसाइड नोट लिहून ठेवली नाही, असे सांगण्यात आले असले तरी एसटी महामंडळातील कमी पगार व अनियमितता यास कंटाळून संबधित कर्मचाऱ्याने आत्महत्या केली असावी, असेच आगारातील अनेक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या चालकाची साधारण ७ वर्षे सेवा झाली असून पत्नी व लहान मुलं असल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना भरीव सहाय्य मिळावे, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे.
दरम्यान, जळगावमध्ये मनोज अनिल चौधरी या ३० वर्षीय वाहकाने आजच आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असताना रत्नागिरीतही तशीच घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चौधरी याने आपल्या सुसाइड नोटमध्ये आत्महत्येस ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे सरकारवर चौफेर टीका होऊ लागली आहे. यावर कर्मचाऱ्यांना संयम दाखवण्याचे आवाहन परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी केले आहे.







