जळगाव (संपादक सुनिल पाटील) – जळगाव जिल्ह्यातील एका एस.टी. कर्मचाऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. एस.टी. कंडक्टरने ठाकरे सरकारवर आरोप करत आत्महत्या केली. या घटनेवरून भाजपानं ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करून सरकारला जाब विचारला आहे.
“आता तरी सरकारने जागे व्हावे. एसटी कर्मचार्यांची कुटुंब अतिशय हलाखीच्या स्थितीत आहेत. जळगाव आणि रत्नागिरीच्या या दोन घटनांसाठी जे दोषी आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करणार? या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार का?,” असा सवाल फडणवीस यांनी ठाकरे सरकारला केला आहे.
दिवाळीचा सण तोंडावर असताना पगार थकल्यानं एका एस.टी कर्मचाऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. माझ्या आत्महत्येला एसटी महामंडळातील कार्यपद्धती व ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत या कंडक्टरनं टोकाचं पाऊलं टाकलं. जळगावमधील मनोज अनिल चौधरी या एस.टी कंडक्टरने सोमवारी (९ नोव्हेंबर) गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चौधरी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे.
या घटनेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हळहळ व्यक्त केली आहे. “वेतन न मिळाल्याने २ एसटी कर्मचार्यांनी आत्महत्या केल्या. या अतिशय वेदनादायी, मनाला अस्वस्थ करणार्या घटना आहेत. एसटी कर्मचार्यांच्या व्यथा आणि वेदनासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करून सुद्धा राज्य सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही २ कुटुंब उघड्यावर आली आहेत,” असं सांगत फडणवीस यांनी हळहळ व्यक्त केली आहे.







