एसटी महामंडळात तब्बल ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; एसटीच्या मुख्य कामगार अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष

अलिबाग (सोगावकर) – एसटी महामंडळात शनिवारी पर्यंत राज्यात एकूण 114 कर्मचारी कोरोना बाधित झाले आहे. यामध्ये मुंबई विभागात 56 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून आतापर्यंतचा एसटी महामंडळातील हा आकडा सर्वाधिक आहे. तर ठाणे विभागात 30 कर्मचारी बाधित झाले असून 2 कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.
मुंबई उपनगरातील अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने एसटी आणि बेस्टवर प्रवासी सेवा देण्याची जबाबदारी दिली होती. त्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर विभागातील कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवा देण्यासाठी मुंबईत कामावर येणाऱ्या सूचना महामंडळाने दिल्या होत्या, मात्र प्रवासी सेवा देतांना महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही ठोस उपाययोजना केली नसल्याने अखेर एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची विषाणूची बाधा झाली आहे.
नुकतेच मुख्य कामगार अधिकारी यांनी राज्यातील विभाग नियंत्रकांना कोरोना बांधीत कर्मचाऱ्यांची आकडेवारी मागितली होती. त्यावरून राज्यात एकूण 114 कोरोना बाधित कर्मचाऱ्यांची संख्या पुढे आली आहे. यामध्ये मुंबई मध्ये सर्वाधिक कर्मचाऱ्यांना बाधा झाली असून, त्यांनतर ठाणे, पुणे, सोलापूर येथे ही कोरोना बाधित एसटी कर्मचारी सापडले आहे. मात्र, या बाधित कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी किंवा त्यापासून इतर कर्मचाऱ्यांना बाधा होऊ नये, यासाठी एसटीच्या मुख्य कामगार अधिकाऱ्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने, महामंडळातील बाधित कर्मचाऱ्यांची संख्या अजूनही वाढण्याची शक्यता आहे.
कोरोना बांधीतांचे आकडे लपवण्याचा प्रयत्न:-
ठाणे विभागात कोरोना बाधित कर्मचाऱ्यांची आकडेवारी सर्वाधिक आहे. मात्र ही आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न एसटी प्रशासनाचा असल्याचा आरोप एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेने केला आहे.
50 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीवरही प्रश्नचिन्ह:-
कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्यास, त्यांच्या कुटुंबियांना मिळणारा 50 लाखांचे सानुग्रह आर्थिक सहाय्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केलेले होते. त्यांनतर 1 जून रोजी एसटी महामंडळातील तत्कालीन अधिकार माधव काळे यांचा कंत्राटी पदाची मुदत संपल्यानंतर ही 1 जून रोजी अनधिकृत परिपत्रक काढून 50 लाखांचा लाभ देण्यासंदर्भात राज्यातील विभाग नियंत्रकांना सूचना केल्या होत्या.मात्र हे परिपत्रकच गैर असल्याचा आरोप राज्य एसटी वर्कर्स काँग्रेस इंटकने केला होता. मात्र अद्याप सुधारित परिपत्रक निघाले नसल्याने कोरोना बाधित होऊन मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 50 लाखांचा आर्थिक लाभ मिळणार की नाही ? यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here