नवी दिल्ली – वाढत्या कोरोना संक्रमणादरम्यान दिल्ली-मुंबई रेल्वे सेवा बंद करणार असल्याच्या बातम्या बऱ्याच वृत्तवाहिन्यांनी चालवल्या आहेत. त्यावर आता रेल्वे मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलं आहे. रेल्वेने दिल्ली-मुंबई रेल्वे सेवा बंद करणार असल्याच्या बातम्या निराधार आणि पूर्णपणे खोट्या असल्याचं सांगितलं आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणं लक्षात घेता मुंबई-दिल्ली दरम्यानची रेल्वे सेवा थांबविली जाणार आहे, असं वृत्त बर्याच माध्यमांनी दिलं आहे. त्यावर रेल्वे विभागाकडून आता स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. रेल्वेने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
सध्या अशा कोणत्याही निर्णयावर चर्चा झालेली नाही. महाराष्ट्र सरकारकडून असा प्रस्ताव दिला जाऊ शकतो, परंतु ट्रेन बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारलाच घ्यावा लागेल. बर्याच वृत्तवाहिन्यांनी दिल्ली-मुंबईदरम्यान रेल्वे सेवा थांबवली जाऊ शकते, अशा बातम्या चालवल्या आहेत. त्या पूर्णतः चुकीच्या आणि निराधार असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. दिल्लीत कोरोना संसर्गाच्या प्रकरणात अचानक वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. 28 ऑक्टोबरपासून दररोज दिल्लीत कोरोना संसर्गाची 5 हजारांहून अधिक प्रकरणे सापडत आहेत. 11 नोव्हेंबर रोजी ही संख्या 8 हजारांच्या पलीकडे गेली होती. गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाच्या साडेसात हजारांहून अधिक केसेस नोंदवल्या गेल्या आहेत.
राजधानी दिल्लीत कोरोनाचे वाढते संक्रमण पाहून केंद्र सरकारने केंद्रशासित प्रदेशात उच्चस्तरीय पथके पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. यासह केंद्र सरकारनेही राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात चाचण्या घेण्याचे आणि संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीत कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. तसेच त्या ठिकाणी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मुंबईकरांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.







