ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सर्व खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद राहणार आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना सदर निर्देश दिले होते, त्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणांना आदेश दिले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात सध्या आटोक्यात असला तरी दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या काळात कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. या दृष्टीने पुढील 4 ते 6 आठवडे खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याशी विचारविनिमय केल्यानंतर सदर निर्णय घेण्यात आला आहे. 23 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या जिल्ह्यातील शाळा आता 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत.
नियमितपणे ऑनलाईन क्लासेस तसेच अन्य उपक्रम सुरू असणार आहेत. शालेय शिक्षण विभागाकडून 30 ऑक्टोबरनंतर शाळांमध्ये 50 टक्के शिक्षकांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच शिक्षकांनी शाळेत ऑनलाईन शैक्षणिक अभ्यासक्रम, विविध उपक्रम, पर्यायी शिक्षण या सर्व बाबींवर काम करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यांचे पालन करणे संबंधित शाळा प्रशासनावर बंधनकारक असेल, असेही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच दहावी तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे बारावी यांच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणेच सुरू ठेवण्यात आल्या असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.
येत्या सोमवारपासून राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु होणार नाहीत, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिले आहेत. त्यानुसार येत्या 31 डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा या बंदच ठेवण्यात येणार आहेत. राज्यात सध्या जरी कोरोना नियंत्रणात असला तरी दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असे बोलले जात आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईत कोरोनाची स्थिती वाढू नये, याची काळजी घेत आहेत.







