धुळे (विशेष प्रतिनिधी) – शिरपूर तालुक्यातील दोन गावांत पोलिस, महसूल आणि वन विभागाने केलेल्या संयुक्तिक कारवाईत गांजाची शेती व सुका गांजा असा 30 लाखांचा ऐवज जप्त केला आहे. या गांजाच्या शेतीसाठी वन विभागाची जमिनीचा वापर होत असल्याने या जमिनी सरकार जमा करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
शिरपूर तालुक्यात मोठया प्रमाणावर गांजाची शेती सुरु असल्याची माहिती पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित व अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी विशेष पथक तयार करुन कारवाई करण्याचे नियोजन केले. त्यानुसार पोलिस, महसूल व वन विभागाने उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने व प्रदीप मैराळे, तहसिलदार आबा महाजन, सहायक वनसंरक्षक अमित जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत, शिरपूर शहरचे निरीक्षक हेमंत पाटील, तालुका पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अभिषेक पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सचिन साळुखे यांच्यासह शिरपूर उपविभागातील १० पोलिस अधिकारी, ६५ पोलिस कर्मचारी, महसूल विभागातील ३ नायब तहसिलदार, १३ मंडळ अधिकारी, सांगवी वनपरिक्षेत्रीय अकिधकारी मेश्राम व त्यांचे 10 वनपाल व वनरक्षक असे चार पथके तयार करण्यात येवुन आज अतिदुर्गम भागात शोध मोहीम राबवण्यात आली.
या शोध मोहिमे अंतर्गत मौजे चिलारे व लाकडया हनुमान शिवारातील शोध मोहिमेत रतनसिंग पाडवी यांच्या शेतात गांजाच्या झाडांची लागवड केल्याचे आढळले. तर लाकडया हनुमान शिवारात वनजमिनीवर राहुज्या नाना पाडवी यांच्या ताब्यात असलेल्या वन विभागाच्या शेतात गांजा कोरडा करण्यासाठी टाकलेला आढळला. या कारवाईत १२ लाख १० हजाराचा ६०५ किलो वजनाची गांजाची रोपे व ८ लाख १५ हजार रुपये किमतीचे १६३ किलो सुका गांजा जप्त करण्यात आला.
पण कारवाईसाठी विशेष पथक आल्याचे पाहुन या दोन्ही शेतांचे मालक व कामगार यांनी पलायन केले. त्यामुळे आता वन विभागाने या जमिनी ताब्यात घेण्यासाठी कार्यवाही करण्याचे निश्चित केले आहे. तसेच यापुर्वी देखील वन विभागाच्या जमिनीवरील गांजाच्या शेती संदर्भात कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांनी सांगितले आहे की, शिरपूर तालुक्यातील शेतांमधे गांजाची लागवड आढळल्यास त्याची माहिती पोलिस विभागाच्या निदर्शनास आणुन देण्याचे आवाहन केले आहे.







