कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – आजरा तालुक्यातील धामणे येथे आज सकाळी ९ ते ९.४५ दरम्यान सख्ख्या चुलत भावानेच जमिनीच्या वादातून भावाचा काटा काढत खून केल्याची घटना समोर आली आहे. शिवाजी परसू सावंत (वय ५५) असे मृताचे नाव असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उत्तूर दूरक्षेत्र पोलिसांत नोंद झाली असून संशयित आरोपी संजय महादेव सावंत (वय ५२) याने स्वतः पोलिस ठाण्यात येऊन वाद झाल्याचे सांगितले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवाजी परसू सावंत आणि संजय महादेव सावंत हे दोघे सख्खे चुलत भाऊ आहेत. त्यांच्यात गेली १२- १३ वर्ष जमिनीचा वादविवाद सुरू आहेत. धामणे – बेलेवाडी रस्त्याला असणार्या शेतांमध्ये जनावरे चरण्यास गेल्यावर शिवाजी यांचा धारदार हत्याराने खून झाला. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी ९ ते ९.४५ दरम्यान उघडकीस आली. याची तात्काळ माहिती उत्तूर दूरक्षेत्र पोलिस ठाण्यात देण्यात आली.
त्यानंतर तात्काळ उत्तूर दूरक्षेत्र पोलिस ठाण्याणे कर्मचारी स.पो.नि. बालाजी भांगे यांनी जाऊन पाहणी केली. अधिक तपास स.फो.बी.एस कोचरगी करीत आहेत. तर मयत शिवाजीच्या पश्चात दोन मुले व पत्नी असून दोन्ही मुले नोकरीनिमित्त बाहेरगावी असतात. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.







