खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – सेल्फी काढण्याच्या नादात कायगाव टोका येथील गोदावरी नदीच्या पुलावरून एक विवाहितेचा नदीत पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (२९ नोव्हेंबर) घडली. विवाहितेचे नाव गीता शंकर जाधव (२१, रा. नेवासा, अहमदनगर) असे आहे.
याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी गीता जाधव ही विवाहितेला औरंगाबाद येथून आपल्या भावासोबत नेवासा येथे आपल्या माहेरी जात होती. गोदावरी नदीच्या कायगाव टोका या पुलावरून जात असताना तिला सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. तिने सेल्फी घेण्यासाठी भावाला थांबविले. पुलावर छायाचित्रे काढली. सेल्फी काढण्याच्या नादात काठड्याजवळ असताना तोल जाऊन ती गोदावरी नदीच्या पात्रात पडली.
प्रसंगावधान राखत काही जणांनी नदीत उडी घेऊन तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. तिला बेशुद्धावस्थेत बाहेर काढण्यात आले. तिला गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, तिला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणाची नोंद गंगापूर पोलिस ठाण्यात घेण्यात आली आहे. तिचा विवाह आठ महिन्यांपूर्वीच झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.







