औरंगाबाद (विशेष प्रतिनिधी) – राजकारणामध्ये भल्याभल्या व्यक्तींना सत्तेची खुर्ची सोडवत नाही. काही जण मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असे म्हणत राहतात. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र खुर्ची संदर्भात एक नवीन आदर्श घालून दिला.

१६८० कोटी रुपयांच्या पाणी योजनेसह विविध विकासकामांच्या भूमिपूजन समारंभासाठी मुख्यमंत्री ठाकरे शनिवारी संभाजीनगर येथे आले होते. त्यावेळी आयोजित समारंभात व्यासपीठावर सर्व सन्माननीय पाहुण्यांना एक प्रकारची खुर्ची ठेवण्यात आली होती. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी सिंहासनाप्रमाणे आकाराने मोठी अशी खुर्ची ठेवण्यात आली होती.

व्यासपीठावर दाखल होताच मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही तफावत निदर्शनास आणून दिली. मला इतर सर्वांप्रमाणेच सामान्य खुर्ची द्या. ही विशेष खुर्ची नको, असे म्हणत त्यांनी इतरांप्रमाणेच असलेल्या खुर्चीवर बसणे पसंत केले. सार्वजनिक, जाहीर ठिकाणी बडेजाव करीत सिंहासनावर बसणे मिरविण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेच्या हृदयसिंहासनावर विराजमान होणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांचा ध्येयवाद आणि साधेपणा प्रकर्षाने उपस्थितांना भावला!
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणात अनेक मार्मिक कोपरखळ्या मारल्या. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि संभाजीनगर वासियांचे प्रेमाचे नाते होते. त्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी, आम्ही नाती जपणारी माणसं आहोत! असा टोला लगावला. मुख्यमंत्री पदासाठी नाते तोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाला च हा टोला होता, हे सूज्ञ माणसास सांगणे न लगे!
रस्त्यांचा उल्लेख करताना देखील त्यांनी मागील सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कारभाराला टोला लगा विण्याची संधी सोडली नाही. गेल्या काही वर्षांमध्ये रस्त्यांवर बरेच खड्डे पडले आहेत. मात्र आता आम्ही ते खड्डे बुजवण्याचे काम करीत आहोत. महाविकास आघाडी सरकारच्या कारभारात सारे कसे गुळगुळीत आहे. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे संभाजीनगरसह संपूर्ण महाराष्ट्र या विकासाचा अनुभव घेईल, असे ते म्हणाले.
समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान आपल्या बागा जात असल्यामुळे काही शेतकरी साश्रू नयनांनी आमच्याकडे आले होते आम्ही त्यांची विचारपूस केली इतकेच नव्हे तर शेतकर्यांच्या घरात बांधापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्या सोडवल्या. सध्यासारखे त्यांना ताटकळत ठेवले नाही. किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले नाही, असा टोला देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी देशभरात शेतकऱ्यांनी अन्यायकारक कृषी कायद्यांच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनाचा अप्रत्यक्ष संदर्भ देत दिला.







