आटपाडी (प्रतिनिधी) – आटपाडी तालुक्यातून दोन मार्गाने गदिमांची आगीनगाडी गदिमा एक्सप्रेस, माणदेश एक्सप्रेसच्या रुपात धावल्यास ती लाखोंच्या अंतकरणातील गदिमांना अनोखी आदरांजली ठरेल त्यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे तातडीने पाठपुरावा करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक आटपाडी यांनी केली आहे .
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पाठविलेल्या ईमेल पत्राद्वारे केली आहे . आज गीत रामायणकार, महाकवी ग.दि. माडगूळकर यांची त्रेचाळीसावी पुण्यतिथी आहे . त्या पार्श्वभूमीवर या महत्वपूर्ण मागणीच्या पत्राच्या प्रती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील, उद्योग, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, सांस्कृतीक कार्य मंत्री अमित देशमुख , सांस्कृतीक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सहकार, मराठी भाषा राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना पाठविल्या आहेत .
सांगली गदिमा जनआंदोलन समितीच्या वतीने सांगली आणि महाराष्ट्रासह काही राज्ये आणि काही देशात होणाऱ्या स्मारक मागणीच्या अभिनव आंदोलनास पाठींबा व्यक्त करून सादिक खाटीक यांनी,गदिमांच्या गीतातल्या आगीनगाडीला वास्तवात आणून आटपाडी तालुक्यातून जाव्यात अशा दोन मार्गावरून गदिमांच्या नावच्या गदिमा एक्सप्रेस, माणदेश एक्सप्रेस या आंतरराज्य वाहतूक करणाऱ्या रेल्वे गाड्या सुरु करणे ही गदिमांना अनोखी आदरांजली ठरणार असल्याचे स्पष्ट करून सादिक खाटीक यांनी,रेल्वे वाहतूकीची सुविधा हे तर आटपाडीकरांचे ७० वर्षापासूनचे स्वप्न आहे .भारतभर विखुरलेला गलाई बांधव, पोर्ट ट्रस्ट सारख्या विविध ठिकाणी हमालीत असणारे हजारो माणदेशी , विविध राज्यातल्या कापड गिरण्या ,उद्योगां मध्ये काही पिढ्यांना समर्पित करणारे हजारो दुष्काळ ग्रस्त विणकर , कामगार , माणदेशातल्या ६०० गावांमध्ये शेळी, मेंढी, दुभती ,कष्टाळू खिलार जनावरे सांभाळणारे हजारो पशुपालक यांच्या दृष्टीने आणि आकर्षक अविट गोडीची लालभडक माणदेशी डाळींबे तथा इंडियन अनारने जागतिक बाजार पेठ ही कवेत घेण्याचा प्रयत्न चालविला आहे . या डाळींब उत्पादक हजारो शेतकऱ्यांच्या हष्टीने ही रेल्वे वाहतूक मोठी पर्वणी ठरणार आहे . गदिमांनी लिहीलेल्या,
झुक झुक झुक झुक आगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी
पळती झाडे पाहू या, मामांच्या गावाला जावू या !
या बालगितांने रेल्वेच्या स्वप्ना बाबत तिसऱ्या पिढीलाही आजअखेर आशावर्धक ठेवले आहे .देशाच्या प्रगतीच्या या मुख्य वाहीनी रेल्वेला आटपाडी मार्गे विजापूर – बारामती आणि आटपाडी मार्गे गुहागर – पंढरपूर अशा मार्गे सत्यात आणत या मार्गावरून गदिमा एक्सप्रेस धावल्या पाहीजेत. असे स्पष्ट केले .
ग.दि.माडगूळकरांच्या कार्य कर्तृत्वाला न्याय देतील अशी शेटफळे ,माडगूळे ,आटपाडी आणि पूणे येथे परिपूर्ण स्मारके तातडीने उभी कराच तथापि गदिमांना मरणोत्तर भारतरत्न, महाराष्ट्र भूषणने गौरविण्यासाठी राज्य शासनाने सत्वर पुढाकार घ्यावा , जन्मशताब्दी वर्षात दि. १ ऑक्टोबर २०१८ रोजी गदिमांचा भारतरत्न ,महाराष्ट्र भुषणने गौरव केला जावा अशी मागणी आपण केल्याचे सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले . राज्य शासनाने गदिमांना तातडीने महाराष्ट्र भुषण जाहीर करून भारतरत्न साठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा त्यासाठी विधीमंडळाच्या या दोन दिवशीय अधिवेशनामध्ये विशेष ठरावाद्वारे केंद्राचे लक्ष वेधले अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे .
आटपाडी तालुक्याने विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेली अनेक रत्ने राज्याला देशाला दिली . या सर्वात कोहीनूर शोभावेत अशी साहित्य, चित्रपट व इतर क्षेत्रातील डोळे दिपविणारी कामगिरी गदिमांची राहीली आहे . परमेश्वरी अविष्काराचा अंशच गदिमा आण्णा होते . आटपाडी तालुक्यातल्या या तिन्ही स्मारकांमध्ये १००० आसन क्षमतेचे सांस्कृतीक भवन व्हावे , ग्रंथालय , अभ्यासिका , मोफत वाचनालय केले जावे , यामध्ये गदिमां सह माणदेशातील साहित्यीकांचे समग्र साहित्य , ग्रंथसंपदा असावी , पर्यटकांसाठी शासकीय विश्रामगृह , शिशु विहार , बलो उदयान व सावलीचे घडयाळ करणेत यावे, वनस्पती शास्त्र युक्त प्रशस्त बाग असावी, लहान मुलांसाठी बागेत एका बाजुस पोहण्याचा तलाव , खेळांसाठी क्रिडांगण असावे, ही स्मारके पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करावीत , वृंदावन गार्डनच्या धर्तीवर या पुण्यासह चार ही स्मारकांमध्ये ग . दि . माडगूळकर यांच्या गितांच्या रोषणाईचा नेत्रोत्सव असावा , माणदेशातील लोककलांचे ,लोकगीतांचे कलादालन सर्व स्मारकांचे आकर्षण ठरावे .
आटपाडी — माडगुळे, आटपाडी — शेटफळे आणि उंबरगांव — आटपाडी– भिवघाट या ३ मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा उंच आणि भव्य अशा संगमरवरी फरशांच्या ५६ होर्डींग्ज वर गदिमांच्या गीत रामायणातील अजरामर ५६ गीते चितारूण गदिमांच्या परमेश्वरी प्रतिभेला वंदन केले जावे . गदिमा जन्मभूमी,कर्मभूमी मध्ये येणाऱ्या प्रत्येकाला आटपाडीतून माडगूळे, शेटफळेला जाताना संथ गतीने अथवा चालत जाण्याचा मोह व्हावा . इतक्या सुंदरतेने हे रस्ते गीत रामायणाच्या पवित्र गीतांनी भारले जावेत असे ही शेवटी सादिक खाटीक यांनी पत्रात शेवटी म्हटले आहे .







